नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सरकार बनवण्याबाबत संभ्रम कायम असताना माजी मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे नेता अरविंद
केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राजधानी दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न पूर्णत्वास गेल्यास घटना दुरुस्ती करून हा प्रदेश पुन्हा केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप
केजरीवाल यांनी केला.
केजरीवाल यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सरकारचा एक वरिष्ठ अधिकारी एका वरिष्ठ संपादकाने
आपल्याला सांगितले की, भाजप आणखी एकदा दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल; परंतु सरकार स्थापन करण्यात पक्षाला अपयश आले, तर विधानसभा भंग करण्याची शिफारस सरकार करील. त्याचबरोबर घटना दुरुस्ती करून दिल्ली विधानसभा कायमस्वरूपी भंग करून राजधानीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचा भाजपचा डाव आहे. हे खरे आहे का अशी विचारणा करत त्यांनी भाजपकडे या प्रश्नांची उत्तरे मागितली आहे.
यावर भाजपचे नेते प्रभात झा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, केजरीवाल केवळ ट्विट करणेच माहीत आहे. त्यांची एनजीओ संघटना होती. दुर्दैवाने त्याचे राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे. त्यामुळे त्यांच्या असल्या जर-तरच्या गोष्टींवर आम्ही टिप्पणी करू इच्छित नाही. दिल्ली विधानसभा १७ फेब्रुवारीपासून संस्थगित आहे.