नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर जवळपास चार महिन्यांनी काँग्रेस नेतृत्व पक्षाला नव्याने मजबूत करण्याची तयारी करीत आहे. त्यासाठीच्या अॅक्शन प्लॅनची ब्ल्यू प्रिंट देखील तयार केली जात आहे. पक्षामध्ये नवीन वर्किंग स्टाइल विकसीत करण्याचा पक्ष नेतृत्वाचा मानस आहे. केंद्रीय नेतृत्वाने अॅक्शन प्लॅनची औपचारिक घोषणा करण्यासाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याची डेडलाइन निश्चित केली आहे. दिवाळी दरम्यान पक्षाचे चिंतन शिबीर होण्याची देखील शक्यता आहे. विशेष म्हणजे, 19 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचे निकाल लागलेले असतील.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी परदेश दौर्यावरुन मंगळवारी स्वदेशी परततील. तेच पक्षाची आगामी रणनीती ठरविण्याच्या दिशेने 20 सप्टेंबरपासून चर्चा आणि विचार करणार आहेत. पक्ष एकजूट राहाण्यावर राहुल गांधी भर देणार आहेत. याशिवाय पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावरही चर्चा केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी पक्षाध्यक्ष
सोनिया गांधींसह नवीन अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतील. यात पक्षाचे काही ज्येष्ठ नेते राहुल यांना मदत करणार आहेत.
राहुल गांधी कित्येक महिन्यांपासून पक्षाची कार्यपद्धती बदलली पाहिजे यावर बोलत आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्ली, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील निवडणूकीतील पराभवानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले होते. तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते, 'काँग्रेसमध्ये लोकांच्या आशा-आकांक्षानुसार काम करण्याची धमक आहे. मी पक्षाच्या संघटनात्मक बदलांवर जोर देणार आहे. बदल झाले पाहिजे आशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी निश्चित एक कार्यक्रम तयार करणार आहे. त्यासाठी
आपल्याला पक्षातील सर्वांना या प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे लागेल.'