नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन
दाऊद इब्राहिम हा 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर 15 महिन्यांत आत्मसमर्पण करणार होता. या संदर्भात त्याने सीबीआयचे डीआयजी नीरज कुमार यांच्यासोबत तिनदा चर्चाही केली होती. परंतु, सीबीआय आणि दाऊदमधील चर्चा काही कारणांमुळे फिसकटली. सीबीआयने दाऊदची ऑफर नाकारली होती. त्यामुळे कदाचित आज दाऊद मोकटच आहे.
नीरज कुमार यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दाऊद इब्राहीमविषयी गौप्यस्फोट केला.
'डी-कंपनी'च्या नावाने दाऊद मुंबईत काळे धंदे करत होता. भारतासह अनेक देशात त्याचे जाळे पसरले आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी आहे.
दाऊदला होती शत्रुंकडूनच भीती...
'जून 1994 मध्ये दाऊद इब्राहिमने माझ्याशी तीनदा चर्चा केली होती. तो आत्मसमर्पण करण्याच्या विचारात होता. परंतु, त्याच्या मनात एक भीतीही होती. ती म्हणजे, तो भारतात आला तर त्याचे शत्रु त्याला जिवंत ठेवणार नाहीत. मात्र, मी त्याला सुरक्षा देण्याचे आश्वासनही दिले. भारतात त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सीबीआयची असेल, परंतु, तो ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता', असे नीरज कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
वरिष्ठांनी दिला नव्हता निर्णय...
दाऊदसोबत फोनवर चर्चा सुरु होती. तो आत्मसमर्पण करणार होता. यासंदर्भात वरिष्ठांना देखील माहिती देण्यात आली होती. परंतु, वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. उलट दाऊदसोबत सुरु असलेली चर्चा थांबवण्यास सांगितले. त्या काळात पीव्ही नरसिंह राव हे पंतप्रधान होते.
दिल्ली पोलिस आयुक्तपदावरून नीरज कुमार जुलै 2013मध्ये सेवानिवृत झाले. नंतर कुमार यांनी मुंबई 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या सीबीआय चौकशीचे नेतृत्त्व केले. या बॉम्बस्फोटात 257 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच 700 लोक जखमी झाले होते.
ज्येष्ठ विधिज्ज्ञ जेठमलानी यांनीही केला होता दावा...
मुंबई बॉम्बस्फोटानंतर भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊदने
आपल्यालाही फोन करुन आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले होते, असा दावा देशातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांनी केला होता. दाऊदने स्वत:ला आत्मसमर्पण करण्यास तयार होता. परंतु, त्यासाठी त्याने काही अटी घातल्या होत्या. मुंबई पोलिसांनी आपल्याला 'हाऊस अरेस्ट' करावे. आपल्याला तुरुंगात न ठेवता राहात्या घरी नजर कैदेत ठेवावे, अशी दाऊदची अट होती. मात्र, तत्कालीन सरकारने त्याच्या अटी मान्य केल्या नाही, असेही जेठमलानी यांनी म्हटले होते.