जयपूर - पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या पठाणकोट हवाई दल तळावरील हल्ल्यानंतर बदला घेण्याची भाषा करणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर अजूनही आक्रमकच असून देशाची सहन करण्याची क्षमता आता संपली आहे. आता आम्ही काही ना काही तरी जरूर करू, असे सांगत त्यांनी पाकिस्तानला थेट इशाराच देऊन टाकला आहे.
पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार अर्थसंकल्पपूर्व चर्चा करण्यासाठी पर्रीकर राजस्थान दौऱ्यावर आलेले आहेत. पठाणकोट हल्ल्याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही सतर्क आहोत आणि अशा प्रकारचे दु:ख झेलण्याची आपल्यावर पुन्हा वेळ येऊ नये, असे काही ना काही जरूर करू; परंतु त्याचे परिणाम हाती येण्यासाठी वर्षभर तरी प्रतीक्षा करावी लागेल.
पाकिस्तानकडून भारतीय लष्करी स्थळांवर हेरगिरी आणि हल्ले करण्याच्या प्रयत्नांसंदर्भात पर्रीकर म्हणाले की, देशातील लष्करी स्थळांचे लवकर सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात येईल आणि सुरक्षेतील त्रुटी करून आवश्यक ती चोख सुरक्षेची व्यवस्था केली जाईल. प्रारंभी बेस कमांडर स्तरावर सुरक्षा लेखापरीक्षण केले जाईल आणि नंतर विशेष दलामार्फत लष्करी ठिकाणांचे सुरक्षा लेखापरीक्षण करून घेण्यात येईल. आता ड्रोनद्वारे हेरगिरीसाठी केली जात आहे. मात्र, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णत: सतर्क आहे.
‘हनी ट्रॅप’मध्ये हवाई दलाचे कनिष्ठच
हवाई दलातील अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकत असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर म्हणाले की, अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. अशा घटना कनिष्ठ स्तरावरच घडताना दिसत आहेत. हनी ट्रॅपमध्ये अडकण्याचे प्रकार हवाई दलातील उच्च पातळीवर होत असतील असे मला वाटत नाही.