आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - लग्न करूनही ते नाकारणार्या महिला शिक्षिकेस दिल्ली उच्च न्यायालयाने अनोखी शिक्षा फर्मावली. खोटे बोलण्याचे प्रायश्चित्त म्हणून महिलेने महात्मा गांधीजींच्या समाधिस्थळी ‘राजघाटा’वर जाऊन आठवडाभर दररोज चार तास प्रार्थना करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती कैलास गंभीर व इंद्रमित कौर यांच्या खंडपीठाने हा अनोखा निकाल दिला. फराहा खातून असे या महिलेचे नाव आहे. उच्च न्यायालयाने या महिलेला खोटे न बोलण्याचा इशारा अनेक वेळा दिला होता, परंतु तिची ही सवय काही सुटत नव्हती. अर्थात, नंतर तिने खोटो बोलण्यासाठी न्यायालयाची माफी मागितली. परंतु न्यायालयाने ती स्वीकारली नाही. खोटे बोलून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयाने तिला दोषी ठरवले व त्याचे प्रायश्चित्त म्हणून तिला ‘राजघाटा’वर जाऊन प्रार्थना करण्याचे आदेश दिले. यानुसार महिलेला आठ दिवस दररोज चार तास याप्रमाणे राजघाटावर प्रार्थना करावी लागणार आहे. याशिवाय तिला दोन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला असून ही रक्कम महात्मा गांधी ट्रस्टच्या खात्यावर जमा करावी लागणार आहे. पोलिसांना महिलेच्या आचरणावर लक्ष ठेवण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
यासाठी झाली शिक्षा
दिल्ली महानगरपालिकेच्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असलेल्या फराहा खातून व राकेश यांनी नऊ एप्रिल 2012 रोजी विवाह केला. 30 एप्रिल 2012 रोजी त्याची नोंदणी केली. त्यानंतर त्या दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला. प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हा महिलेने न्यायालयासमोर राकेशसोबत विवाह केल्याचेच नाकारले, परंतु तिचा खोटेपणा सिद्ध झाल्याने न्यायालय नाराज झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.