नवी दिल्ली / कोची -
इराकच्या आयएसआयएस या सुन्नी दहशतवाद्यांच्या ताब्यातील 46
भारतीय नर्सेस आज (शनिवार) सुखरुप मायदेशी परतल्या आहेत. एअर इंडियाचे विशेष विमान त्यांना घेऊन सकाळी 8.30 वाजता मुंबत आले आणि नंतर दुपारी कोचीत पोहोचले. सऊदी अरब,
इराक आणि आखाती देशातील आपल्या विशेष संपर्काच्या माध्यमातून भारत सरकारने त्यांची सुटका केली आहे. भारतीय नर्सेसना सुखरुप भारतात आणण्यासाठी काही प्रतिष्ठीत व्यापार्यांनीही मदत केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्यानुसार, नर्सेसच्या सुटकेसाठी कोणीही पैसे मागितले नाही. या प्रक्रियेसी संबंधीत एका अधिकार्याने सांगितले, 'नर्सेसना बंदीवान बनवून कुठे ठेवण्यात आले याची माहिती त्यांनी स्वतः फोन करुन भारतीय अधिकार्यांना दिली होती.'
आणखी 50 भारतीय इराकमध्ये
अजूनही 50 भारतीय नागरिक आयएसआयएसच्या ताब्यात आहेत. त्यांना सुरक्षीत भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. स्वतः परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इराक, आखाती देश आणि सऊदी अरबच्या संपर्कात आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, भारत सरकारने आयएसआयएस आणि इराकमध्ये सक्रिय इतर दहशतवादी संघटनांशी बाहेरुन संपर्क साधला. याशिवाय केरळचे अनेक व्यापारी आखाती देशांमध्ये काम करतात. त्यांच्या माध्यमातूनही अपहरण झालेल्यांची सुटका होण्यास मदत झाली.
दहशतवादी कुटुंबीयांना बोलण्याची परवानगी देत होते
केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयएसच्या ताब्यात असलेल्या नर्सेसना तिक्रीत येथून 250 किलोमीटर अंतरावरील मोसूल येथे ठेवण्यात आले होते. दहशतवादी त्यांना जेवण देत होते. तसेच त्यांना घरी फोन करण्याचीही परवानगी होती. दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटलेल्या एकाही नर्सने आजारपणाची तक्रार केलेली नाही.
नर्सेसच्या सुटकेवेळी इराकी नेतेही उपस्थित
शुक्रवारी दुपारी आयएसआयएसच्या नियंत्रणाखालील भाग आणि कुर्दिश यांच्यामधील सीमेवरुन नर्सेसना भारतीय प्रतिनिधींच्या हवाली करण्यात आले. आयएसआयएसच्या ताब्यातून सुटल्या नंतर इर्बिल प्रांताचे गव्हर्नर नवाज शादी हे देखील भारतीय प्रतिनिधीसोबत होते. दहशतवाद्यांच्या ताब्यातील भागापासून नर्सेसना भारतीय दुतावासाच्या वाहनाने विमानतळावर आणण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतीय नर्सेस मायदेशी परततानाची दृष्य.