नवी दिल्ली / जम्मू- जम्मू-काश्मीरच्या पूंछ व राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. लष्करी चौक्या व रहिवासी भागांवर सकाळी ७.३० वाजेपासून गोळीबारास सुरुवात झाली. यामध्ये लष्कराचा जवान शहीद होऊन ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अन्य तीन जखमी झाले आहेत.
भारतीय लष्करानेही पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, राजौरीच्या मंजाकोट सेक्टरमधील सीमेवर जवान मुदस्सर अहमदच्या बंकरनजीक बॉम्ब फुटला. यामध्ये मुदस्सर शहीद झाले. ते जम्मू-काश्मीरच्या त्रालचे रहिवासी होते. यादरम्यान बारोटी भागात नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला व अन्य तिघे जखमी झाले. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रशासनाने सुरक्षात्मक उपाय म्हणून मंजाकोट व बालाकोट भागातील शाळा बंद केल्या. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाकच्या अाक्षेपावर भारताचे उत्तर; ‘सुरुवात तुम्हीच केली’
पाकिस्तानने डीजीएमओला दूरध्वनी करून आक्षेप नोंदवला. पाकिस्तानचे कमांडर मेजर जनरल शमशाद मिर्झा यांनी भारतीय लष्कराच्या गोळीबारानंतर चार जवानांचा बुडून मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारताचे डीजीएमओ ले. जनरल ए.के. भट यांनी सुरुवात पाकिस्ताननेच केल्याचे निक्षून सांगितले. पाकिस्तानने आगळीक केल्यास चाेख उत्तर देणे भारताचा अधिकार आहे,असे बजावण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली.