नवी दिल्ली - काश्मिरी पंडितांसाठी काश्मीर खो-या त स्वतंत्र वसाहत स्थापण्यास विरोध होत असताना रविवारी काश्मीरी पंडितांनी दिल्लीत पुनर्वसनाची मागणी करत जोरदार निदर्शने केली.
जंतरमंतर येथे हे पंडित एकत्र जमले होते. जम्मू काश्मीरमधील विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने शनिवारी जम्मू काश्मीर सरकारला काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती उभ्या करू देणार नसल्याचे जाहीर करून अशा वसाहतींना विरोध केला होता. या उलट अल्पसंख्यांकांना त्यांच्या मूळगावी परत येता यावे यासाठी प्रयत्नांची गरज प्रतिपादीत केली होती. नॅशनल कॉन्फरन्सचे सचिव अली मोहम्मद सागर यांनी यांनी म्हटले आहे की, पंडितांसाठी स्वतंत्र क्लस्टर निर्माण करणे योग्य नाही.
दरम्यान, यासिन मलिक, सईद अली शहा गिलानी आणि इतर फुटीरवादी नेत्यांना तत्काळ अटक करण्याची मागणीही पंडितांनी या वेळी केली.
सईद यांच्यावर विश्वास हीच अडचण
केंद्र सरकार मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या शब्दावर विश्वास ठेवत आहे हीच पंडितांचे प्रश्न सोडवण्यामध्ये मोठी अडचण असल्याचे सीबीएसई मंडळाचे सदस्य अशोक पंडित यांनी म्हटले आहे. ते रविवारी मुंबईहून निदर्शनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते.
काळे टीशर्ट घालून निषेध
जंतरमंतरवर जमलेल्या काश्मीरी पंडितांनी रविवारी काळे टीशर्ट परिधान करून काश्मीरमध्ये पंडितांच्या स्वतंत्र वसाहतींना होत असलेल्या विरोधाचा निषेध केला. जम्मू-काश्मीर विचार मंचचे महासचिव मनोज भान म्हणाले, केंद्र किंवा राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा. यात फुटीरवादी पक्षांना किंवा गटांना मध्यस्थी करण्याची संधी दिली जाऊ नये.