नवी दिल्ली - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 मुले आणि 9 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवर चर्चा करून घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारतातील शाळांनाही दहशतवादाविरुद्ध एकता दाखवण्यासाठी दोन मिनिटांती स्तब्धता बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आव्हान मोदींनी केले आहे. त्यांच्या अपीलनंतर बुधवारी सकाळी बहुतांश शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेनंतर हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
शरीफ यांच्याशी फोनवर चर्चा करताना मोदींनी घटनेबाबत तीव्र दुःख जाहीर केले. संकटाच्या या काळात भारत तुमच्याबरोबर उभा असल्याचे मोदी शरीफ यांना म्हणाले. नवाज शरीफ पेशावरहून इस्लामाबादला परतल्यानंतर या दोघांमध्ये ही चर्चा झाली. मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या या चर्चेबाबत मोदींनी ट्वीटद्वारे माहिती दिली.
शिक्षणाच्या मंदिरात निरागस बालकांची झालेली ही हत्या म्हणजे केवळ पाकिस्तानच्या नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या विरोधातील हल्ला असल्याचे मोदी शरीफ यांना म्हणाले. संपूर्ण जगाला या घटनेमुळे वेदना झाल्या आहेत. त्यामुळे मानवतेवर विश्वास असणा-या देशांनी ठरवून दहशतवाद संपरवायला हवा असेहील मोदी म्हणाले. दोन्ही देशांतील मुलांना दहशतवादाच्या अंधकारापासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचेही ते शरीफ यांना म्हणाले.