आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- एफआयआर दाखल न करणा-या पोलिसांना थेट तुरुंगात पाठविण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरु केली आहे. अशा पोलिसांना एका वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल. गृहमंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्यांना कडक सूचना पाठविल्या आहेत.
कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात दिरंगाई करणा-या पोलिसांविरुद्ध कलम 166 अ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांना देण्याची सूचना करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात कडक सूचना पाठविल्या आहेत. पोलिसांनी तक्रारींबाबत संवेदनशील असले पाहिजे. तक्रारकर्ते पुरुष असो किंवा महिला, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये दिरंगाई करता कामा नये, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. पोलिस कारवाईस विलंब झाल्यास आरोपींना पळून जाण्यास किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळतो.
गेल्यावर्षी राजधानी दिल्लीत तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर पोलिसांवर दिरंगाईचे आरोप करण्यात आले होते. तसेच यावर्षी मार्चमध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीवर अपहरण करुन बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, तपास करताना गुन्हा इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे लक्षात आल्यास कायदेशीररित्या एफआयआर संबंधित पोलिस ठाण्यात वर्ग करुन घेतली पाहिजे. यासंदर्भात राज्य शासनांनी स्पष्ट निर्देश दिले पाहिजे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.