नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्या शाजिया इल्मी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या शाजिया यांनी एका वृत्तवाहिनीने दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली नाराजी व्यक्त केली. शाजिया आज (शनिवारी) पक्ष सोडण्याची घोषणा करू शकतात. त्यांनी आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.
शाजिया इल्मी यांनी सांगितले, की पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. पक्षाने एका मागे एक अनेक चुका केल्या असून आता पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारी संदर्भातही विविध प्रश्न मांडले होते. शाजिया यांना दिल्लीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती परंतु पक्षाने त्यांना गाझियाबादमधून उमेदवारी दिली. गाझियाबादमधून शाजिया यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
विविध मुद्यांवर वेगळे मत
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर दिल्लीमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासोबतच इतर मुद्यांवर शाजिया इल्मी यांचे मत पक्षापेक्षा वेगळे आहे. इल्मी यांनी दिल्लीत सरकार बनवण्यसाठी प्रयत्न केले होते, परंतु पक्षाने त्याला विरोध केला. या संदर्भात शाजिया यांनी अरविंद
केजरीवाल यांच्याशी चर्चा केली होती, परंतु केजरीवाल यांनी समर्थन घेऊन सरकार बनवण्यास नकार दिला होता.