नवी दिल्ली - विजय माल्याची चार शहरांमधील 1,411 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरु केली आहे. त्यानंतर माल्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'सरकारी यंत्रणा माझ्याविरोधात एकतर्फी कारवाई करत आहे. अशा कारवाईला काही अर्थ नाही आणि कायदेशीर आधार नाही. विना ट्रायल मला दोषी ठरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.' माल्या एसबीआयसह इतर बँकांकडून 9000 कोटी रुपये कर्ज घेऊन फरार झाले आहे. त्यांनी देश सोडून लंडनमध्ये पलायन केले आहे.
- सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी लोन डिफॉल्ट प्रकरणी मुंबई, चेन्नई, बंगळुरु आणि कुर्ग येथील माल्यांची 1,411 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
- माल्यांनी आयडीबीआय बँकेकडून घेतलेले 900 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नसल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. माल्यांना डिफॉल्टर ठरविण्यात आले आहे. ते मार्चमध्ये लंडनला पळून गेले.
- ईडीच्या या कारवाईला माल्यांनी चुकीची कारवाई म्हटले आहे. ते म्हणाले, 'मी याआधीही सांगितले आहे, की कर्जाच्या रकमेचा मी चुकीचा वापर केलेला नाही किंवा दुसऱ्या उद्योगासाठी तो फंड वळविलेला नाही.'
- या कारवाईमुळे असे वाटत आहे की मला फरार घोषित करुन यंत्रणा मनी लॉऊंड्रींग प्रिव्हेंशन अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.