(फाईल फोटो- न्यायाधीश ए. आर. दवे. पांढऱ्या सुटात.)
अहमदाबाद- जुन्या परंपरा पुन्हा रुजवायला हव्यात. गीता आणि महाभारत पहिल्या वर्गापासून अनिवार्य करायला हवेत, असे मत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ए. आर. दवे यांनी व्यक्त केले आहे.
परिसंवादाला संबोधित करताना दवे म्हणाले, की गुरु-शिष्य परंपरा नष्ट होत आहे. जर ही परंपरा अस्तित्वात असती तर दहशतवाद, हिंसाचार यासारखी कृत्ये घडली नसती. सध्या देशात सर्वत्र दहशतवाद दिसून येत आहे. लोकशाहीत सगळेच आलबेल असते तर चांगले नेते निवडून आले असते. अशा लोकांनी कुणाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला नसता. सर्व लोकांमध्ये चांगले गुण आणून आपण वाईटावर मात करू शकतो. सर्वदूर पसरलेला हिंसाचार रोखू शकतो. यासाठी आपल्याला पुन्हा जुन्या परंपरांमध्ये जावे लागेल.
गुजरात लॉ सोसायटीने हा परिसंवाद आयोजित केला होता. दवे म्हणाले, की जर कुणी खुप सेक्युलर असेल... सेक्युलर असण्याचा बनाव करणारा सहमत होणार नाही... जर मी भारताचा हुकूमशहा असतो तर पहिल्या वर्गापासून गीता आणि महाभारत अभ्यासक्रमात आणले असते. जिवन कसे जगायला हवे हे यातून शिकता येते. जर कुणी म्हणत असेल मी सेक्युलर आहे किंवा नाही तर मला माफ करा. पण जर काही चांगले असेल तर आपण ते आत्मसात करायला हवे.