बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष अज्जू चौहान यांनी सांगितले की, हिंदू धर्म स्वीकारणारे कुटुंब खूप गरीब आहे. या कुटुंबाने त्यांच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे. मात्र, अन्य लोक त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. धर्म परिवर्तन करण्यासाठी मुस्लिम कुटुंबाला कुठलेही अमिष दिलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आग्रा येथे 60 मुस्लिम कुटुंबातील 250 लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला. देवरी रोडवर धर्म परिवर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा धर्म जागरण समन्वय विभाग आणि बजरंग दलाद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 'पुरखों की घर वापसी' असे नाव देण्यात आले होते. या मुस्लिम कुटुंबांना हिंदू धर्म परिवर्तन करण्यास जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
बजरंग दलाच्या एका सदस्याने सांगितले की, ज्या मुस्लिम कुटुंबियांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. ते सगळे वाल्मिकी समाजाशी निगडीत आहेत. ब्राह्मणद्वारा यज्ञ पूजन करून सगळ्यांना मंत्र देऊन हिंदू धर्मात सहभागी करून घेण्यात आले. नंतर सगळ्यांनी
आपापल्या घराच्या छतावर भगवा झेंडा फडकावला. तसेच मंदिरांत जाऊन परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन प्रसाद ग्रहण केला.
हिंदू धर्माचा स्वीकार करणार्या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. आता या लोकांचे मतदान ओळख पत्र आणि आधार कार्ड नव्या नावाने तयार करण्यात येणार आहे.
आरएसएसचे विभागीय प्रमुख राजेश्वर सिंह यांनी सांगितले की, हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारणार्या लोकांना परत आपल्या धर्मात आणण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. ख्रिसमसला अलिगडमध्ये 5000 हजारांहून अधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक हिंदू धर्म स्वीकारणार आहे. अलिगडमधील माहेश्वरी कॉलेजात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुस्लिम समाजाचे मोहम्मद अजीम भारती आणि हॉटेल मदीनाचे मालक नईम खान यांच्यामते, बजरंग दलाने मुस्लिम धर्मातील लोकांची दिशाभूल केली आहे. मुस्लिम लोकांना हिंदुची टोपी परिधान करून यज्ञपुजेत बसवल्याने ते हिंदू होत नसतात. इस्लाम धर्म कधीच कोणावर जोरजबरदस्ती करत नाही. बजरंग दल शहरातील शांत वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचे अजीम भारती यांनी म्हटले आहे.