श्रीनगर - काश्मीरमध्ये शनिवारी सलग पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. जागोजागी प्रदर्शने करून भारतविरोधी घोषणाबाजी बांदीपोरा पोलिस चौकी जाळून टाकण्यात आली. दुसरीकडे बंदचे पडसाद राज्यात अनेक भागात दिसून आले. राज्यात रेल्वे आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली असून काश्मीर विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला.
बांदीपोरा घटनेचे पडसाद उमटल्याने आतापर्यंतच्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जखमी झाले. काही गटांनी रविवारीही काश्मीर बंदचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यभरात इंटरनेट व मोबाइल सेवा बंद ठेवण्यात आली असून रेल्वे सेवा चार दिवसांपासून ठप्प आहे. अनेक फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सात दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या पाचही जणांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली आहे. केंद्राने राज्य सरकारला परिस्थती तातडीने नियंत्रणात आणा, हिंसाचारात आता एकही बळी जाऊ देऊ नका, असे निर्देश दिले आहेत.
कोर्टाने पोलिसांना फटकारले
या प्रकरणात जम्मू - काश्मीर उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. १२ एप्रिलच्या घटनेनंतर मुलीला कोणत्या आरोपांखाली तुरुंगात ठेवले? अशी विचारणा न्यायालयाने हंदवाडा पोलिसांना केली आहे. तसेच पीडित मुलीचा जबाब मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर घेण्याचे आदेश दिले आहेत. पीडित मुलीच्या आईने आरोप केला आहे माझ्या मुलीने दबाखाली येऊन जबाब बदलल्याचे म्हटले आहे.