अहमदाबाद - राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची मते रद्द ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देणारे भाजप उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोग व काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना नोटीस बजावली.
न्या. बेला त्रिवेदी यांनी निवडणूक आयोग, अहमद पटेल तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा व स्मृती इराणी यांनाही नोटीस बजावली. या नोटिसीला २१ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यायचे आहे. आयोगाने काँग्रेसच्या दोन बंडखोर उमेदवारांची मते रद्द ठरवली होती. त्याला राजपूत यांनी आव्हान दिले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने काँग्रेसच्या आमदारांची मते वैध ठरवली होती. त्यामुळे कुठलेही मत वैध किंवा अवैध ठरवण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असा युक्तिवाद राजपूत यांनी केला आहे. काँग्रेसच्या आणखी २ आमदारांनी त्यांच्या मतपत्रिका अनधिकृत व्यक्तींना दाखवल्या होत्या, त्यामुळे त्यांचीही मते रद्द करावीत आणि आपल्याला विजयी घोषित करावे, अशी मागणी राजपूत यांनी याचिकेत केली आहे.