श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी स्थलांतरित काश्मिरी पंडितांशी चर्चा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्थलांतरितांनी आपल्या राज्यात परत यायला हवे. त्यासाठी आम्ही गंभीरपणे प्रयत्न करत आहोत, अशी घोषणा फुटीरतावाद्यांनी केली आहे.
जामिया मशिदीत शुक्रवारी झालेल्या नमाजनंतर हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवेझ उमर फारूक यांनी ही घोषणा केली. काश्मिरी पंडित राज्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यांनी राज्यात परत यावे. त्यांना कोणतीही पूर्वअट नाही. ते काश्मिरी संस्कृतीचा भाग आहेत. काश्मिरी पंडित कोणत्याही राजकीय विचारसरणीचे असले तरी आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यासाठी हुिरयत कॉन्फरन्स जेकेएलएफ यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिला प्रयत्न : हुरियतसारख्या फुटीरतावादी गटाकडून काश्मिरी पंडितांनी परत यावे, अशी मांडण्यात आलेली भूमिका ही ऐतिहासिक आहे. कारण फुटीरतवाद्यांकडून हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे. कारण १९८९ पासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचारात वाढ झाली. हिंसाचारामुळे सुमारे ६२ हजार काश्मिरी पंडितांनी राज्य सोडून देशातील इतर प्रदेशात वास्तव्याला जाणे पसंत केले. राज्यातून हजारो काश्मिरी पंडितांना आपली घरेदारे सोडून इतर राज्यांत जाऊन राहावे लागले आहे.