आग्रा - ५३ खटले लढवत असलेले बाहुबली अशोक दीक्षित यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. मुलीने वडिलांचा वारसा चालवण्यासाठी ३० लाख पॅकेज मिळणारी परदेशी नोकरी सोडली. पहिले बसपा व नंतर भाजपत सामील झाली. फतेहाबाद येथील निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मागितले. नावनिश्चिती होण्यापूर्वीच ३० वर्षीय रूपालीने आपला प्रचार सुरू केला. नॅशनल क्रिकेट टीममध्ये ती खेळाडू राहिली आहे. ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले.
जुलै २०१५ ची घटना आहे. मी दुबईमध्ये गल्फ पेट्रोकेम कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये वरिष्ठ पदावर नोकरी करत होते. तेव्हा वडील अशोक दीक्षित यांचा फोन आला. त्यांनी म्हटले, ‘तुझे वडील आता म्हातारे झाले आहेत. आता तुझी गरज आहे. ये, राजकारण सांभाळ.’ त्यानंतर फोन कट केला. काही वेळानंतर नातलगाकडून वार्ता मिळाली की त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. मी तत्काळ कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला. काँट्रॅक्टची तीन महिने पुरे करून भारतात आले. त्या वेळी मला ३० लाख रुपये वेतन होते. भारतात आल्यावर मी सरळ बरेली मध्यवर्ती कारागृहात गेले. वडील म्हणाले, लढाई जितकी दीर्घ वाटली होती त्यापेक्षा अधिक लांबली आहे. मी राजकारणाचा बळी ठरलो. तू राजकारणात यावेस असे वाटते. तुझी प्रतिमा स्वच्छ आहे. शिक्षण तुझे बलस्थान आहे. त्यानंतर वडिलांचा मतदारसंघ फतेहाबादमध्ये मी जनसंपर्क वाढवला. पार्टीने तिकिटाचे आश्वासन दिले नाही. मात्र उमेदवारी नाकारली नाही. पित्यावर हत्येप्रकरणी ५३ केसेस सुरू आहेत. ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण यादव यांचे बंधू सुमन यादव यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत आहेत. रूपालीने सांगितले- २० वर्षांच्या वयात मला वडिलांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाणीव नव्हती. जेव्हा मी जयपूरमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा ते मला भेटायला कधी दाढीत तर कधी मिशी ठेवून येत. ते वेशांतर करत. मी २००२ ते २००५ पर्यंत राजस्थानकडून राष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभाग घेतला. मला आर्मी ऑफिसर व्हायचे होते. मात्र शाळेत असताना गुडघ्याला जखम झाली. लोखंडी रॉड टाकला. त्यामुळे ते स्वप्न संपले. वडिलांवर केसेस असल्याचे कळाले तेव्हा वकील बनावे असे वाटले. त्यामुळे वडिलांना सोडवू शकले असते. वडिलांनी मात्र मोठा विचार करण्याचा सल्ला दिला.