कोलकाता - भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काळ्या पैशाप्रकरणी
आपल्याच सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विदेशी बँकांत खाती असणा-या भारतीयांची नावे उघड न करण्याचे कोणतेही सबळ कारण सरकारने दिले नाही, अशी टीका भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी केली.
भारताने इतर देशांशी दुहेरी कर टाळण्याचा करार (डीटीएए) केला असल्याने परदेशातील बँकांत खाती असणा-यांची नावे देता येणार नाहीत, असे सरकार म्हणत आहे, पण ते सबळ कारण नाही. या करारात गोपनीयतेच्या कलमाची तरतूद आहे, पण या अडथळ्यावर मात करता येते. या प्रकरणासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला युक्तिवाद योग्य नाही, असे आपण पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे, असेही त्यांनी सांगितले. परदेशात साठवलेला काळा पैसा परत आणलाच पाहिजे असे स्वामी म्हणाले.