जालंधर (पंजाब) - काँग्रेसने पंजाबात अंमली पदार्थविरोधी अभियान सुरु केले आहे. सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येथे पोहोचले. त्यांनी सरकारविरोधातील धरणे आंदोलनात सहभाग घेतला. पक्ष कार्यकर्त्यांसोबत जमीनीवर बसून घोषणाबाजी केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, 'पंजाबमध्ये व्यसनाधिनता ही सर्वात मोठी समस्या आहे. जर येथे आमचे सरकार आले तर एका महिन्यात पंजाबची यापासून मुक्तता केली जाईल.' उडता पंजाब या चित्रपटाला सेन्सॉर बॉर्डकडून परवानगी दिली जात नाही, यावरुन राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, की येथली काही लोकांना ही समस्या संपू नये असेच वाटत आहे.
राहुल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- राहुल गांधी म्हणाले, 'पंजाबमधील व्यसनाधिनता संपविण्यासाठी येथील पोलिस सक्षम आहेत. मात्र पंजाब सरकार त्यांना काम करु देत नाही.'
- 'पंजाबमध्ये जर काँग्रेसचे सरकार आले तर पोलिस अधिकाऱ्यांना हा नशेचा बाजार उद्धवस्त करण्यासाठी जास्तीचे अधिकार दिले जातील.'
- 'पंजाबच्या युवकांनी सांगितले आहे, की त्यांचे भविष्य खराब होत चालले आहे.'
- राहुल गांधी म्हणाले, 'पंजाबला उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर येथून ड्रग्ज बाहेर काढावे लागेल.' त्यासोबतच मोदींवर टीका करताना ते म्हणाले, 'एकीकडे ड्रग्जची समस्या वाढत असताना मोदी बिझनेसच्या गप्पा मारत आहेत. पंजाबात फक्त एकच बिझनेस चालतो, तो म्हणजे हत्येचा.'
- पंजाबमधील अकाली सरकारवर निशाणा साधताना राहुल म्हणाले, 'अकाली दलाचे सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना अधिक महत्तव देत आहे, तर प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करु दिले जात नाही. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे खून पडत आहे. कायदा आणि सुव्यस्था नावाचे येथे काही शिल्लकच राहिलेले नाही.'