आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनऊ । नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा आणि समाजवादी पक्षाच्या (सपा) नेत्यांमध्ये सुरू असलेले वाक्युद्ध शनिवारीही चालूच होते. आगामी लोकसभा निवडणुकीत सपाची अंत्ययात्राच निघेल, असा घणाघात वर्मा यांनी केला तर याला प्रत्युत्तर देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अशा वक्तव्यांमुळे यूपीएचे नुकसान होईल, असा इशारा दिला.
केंद्रात पोलादमंत्री असलेल्या वर्मा यांनी मुलायमसिंह यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप यापूर्वी केला होता. शुक्रवारी बलरामपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना तर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पक्षांची काय स्थिती राहील, याची आकडेवारीच जाहीर केली. ते म्हणाले, ‘येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला 40, बसपाला 26 आणि भाजपला 10 जागा मिळतील. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणा-या मुलायमसिंह यांच्या पक्षाला केवळ चार जागा मिळू शकतील. या चारच जागा यासाठी की, सपाच्या अंत्ययात्रेत खांदा देण्यासाठी एवढ्याच लोकांची गरज आहे.’
दरम्यान, वर्मा यांनी समाजवादी पार्टीविरुद्ध उघडलेल्या आघाडीमुळे दिल्लीतही राजकारण तापले असून मुलायम यांची केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबद्दलची भूमिका आणि त्यावर काँग्रेसने दाखवलेला बिनधास्तपणा सद्य:स्थितीत चर्चेचा विषय ठरला आहे.
सीबीआयमार्फत काँग्रेस छळ करते
जे लोक आपले मांडलिक बनून राहत नाहीत अशांचा छळ करण्यासाठी काँग्रेस सीबीआयचा वापर करते, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. आगामी निवडणुकीत काँग्रेसला यामुळे चांगला धडा मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला. बेनीप्रसाद वर्मा आणि भाजप करत असलेले दावे धादांत खोटे असल्याचे सांगून जे पक्ष विधानसभा निवडणुकीत पाच-दहा हजारांपेक्षा अधिक मते मिळवू शकले नाहीत, त्यांना तीन-चारपेक्षा अधिक जागा मिळूच शकणार नाहीत, असा दावा अखिलेश यांनी केला.
वर्मांचे मानसिक संतुलन ढासळले आहे : यादव
सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव म्हणाले, वर्मा एक ज्येष्ठ नेते आहेत. कित्येक वर्षे त्यांचे सपाशी नाते होते. त्यांच्या भावनाही आम्ही ओळखू शकतो. वर्मांचा पुत्र राकेश दोन वेळा समाजवादी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभूत झाला आहे. अयोध्येतही विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि त्यांना केवळ चारशे मते मिळाली होती, अशीही माहिती आमच्याकडे आहे. सपाचेच अन्य एक नेते राम आसरे कुशवाह यांनीही वर्मा यांचे मानसिक संतुलन पुरते ढासळले असल्याचे सांगून त्यांना उपचारांची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
भडक वक्तव्यांबद्दल काँग्रेसनेही हात झटकले
वर्मा यांनी एकामागे एक भडक वक्तव्ये करून समाजवादी पक्षाला लक्ष्य केले असले तरी काँग्रेसने मात्र या प्रकरणी हात झटकले आहेत. वर्मा यांच्या वक्तव्याचा पक्षाच्या धोरणाशी काहीही संबंध नसल्याचे प्रवक्ते राशिद अल्वी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष रिता बहुगुणा यांनीही पक्ष अशा वक्तव्याचे समर्थन करणार नाही, असे स्पष्ट केले. बेनीप्रसाद यांचे हे वैयक्तिक विचार असू शकतात, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. दुसरीकडे, काँग्रेसचे सत्यव्रत चतुर्वेदी यांनी थेट वर्मा यांच्या जुन्या घरोब्याचाच उल्लेख केला. ते अजूनही जुने संस्कार विसरलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
बेनींचा हल्लाबोल कशामुळे?
मुलायमसिंह यांच्यावर बेनीप्रसाद यांचा प्रचंड राग आहे. जो माणूस विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाला निवडून आणू शकत नाही तो आता राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याची भाषा करत असल्याचे मुलायम शुक्रवारी म्हणाले होते. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बेनीप्रसाद यांचे पुत्र राकेश वर्मा दरियाबादमधून उभे होते. मात्र, त्यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. सपा उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. ही सल वर्मा यांच्या मनात घर करून बसली आहे. तसेच मुलायम उत्तर प्रदेशात राजकारण करताना कायम मुस्लिमांची बाजू घेत असल्यानेच विधानसभा निवडणुकीत फटका असल्याची वर्मा यांची धारणा असून त्यावरूनच त्यांनी मुलायम यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.