पाटणा - राज्यसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षादेश झुगारणार्या सत्ताधारी जनता दल युनायटेडच्या चार आमदारांची अखेर गच्छंती झाली आहे. सर्व आमदारांना बंडखोरीची किंमत म्हणून आमदारकी गमावावी लागली आहे. शनिवारी त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
विधानसभेचे अध्यक्ष नरेन चौधरी यांनी ही कारवाई केली. ग्यानेंद्र सिंह ग्यानू (बार्ह), नीरज सिंह बबलू (छत्तरपूर), रवींद्र राय (महुआ), राहुल शर्मा (घोसी) अशी निलंबित आमदारांची नावे आहेत. जूनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षादेश झुगारून बंडखोर उमेदवार अनिल शर्मा यांच्यासाठी काम करणे आणि समर्थन देण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यात ते दोषी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. चारही आमदारांना आरोपाला योग्य ते स्पष्टीकरण देता आले नाही. आमदारांवरील कारवाईमुळे जदयूचे विधानसभेतील संख्याबळ घटले आहे. मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी केवळ ‘अध्यक्षांचा निर्णय वैध आणि कायद्याला धरून’ असल्याचे सांगितले.
पक्षीय बलाबल
सध्या २४३ सदस्यीय विधानसभेमध्ये बंडखोरांवरील कारवाईनंतर एकूण संख्या २३८ वर घसरली आहे. या अगोदर उच्च न्यायालयाने एका अपक्ष आमदारालाही निलंबित केले होते. जदयूकडे सध्या ११५ एवढे संख्याबळ आहे. भाजप-८८, राजद-२५, काँग्रेस-५, माकप-१, अपक्ष-४ अशी सध्याची पक्षीय स्थिती आहे. संख्या घटली असली तरी त्यामुळे सरकारला काही धोका नाही.
निर्णय घटनाबाह्य
विधानसभा अध्यक्षांनी चार आमदारांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी ही कारवाई पूर्णपणे ‘घटनाबाह्य’ असल्याचा आरोप सदरील आमदारांनी केला आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी आणखी चार आमदारांनाही चर्चेसाठी बोलावले आहे. २२ नोव्हेंबर रोजी त्यांना बोलावण्यात आले आहे. या आमदारांत पूनमदेवी, अजित कुमार, सुरेश चंचल, राजू कुमार सिंह यांचा समावेश आहे.