मुंबई - महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १ मेनंतरचे आयपीएल सामने राज्याबाहेर हलवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आज आयपीएल कौन्सिलसोबतच्या बैठकीत मुंबई इंडियन्सने जयपूरच्या पर्यायाची निवड केली, तर पुण्याने विशाखापट्टणमला पसंती दिली. आयपीएल कौन्सिलच्या रायपूर, कानपूर व विशाखापट्टणम या पर्यायांपैकी फक्त विशाखापट्टणमची निवड करण्यात आली. अंतिम लढतीसाठी मुंबईऐवजी बंगळुरूला पसंती देण्यात आली आहे. कोलकात्याला फ्ले ऑफच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. कानपूरच्या स्टेडियमचे छत आणि प्रकाशझोत फेकणारे दिवे यांच्या समस्येमुळे तो पर्याय मागे पडला आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका नवोदित पुण्याच्या फ्रँचायझीला बसला आहे. अवघ्या दोन वर्षांसाठी पुणे संघ विकत घेण्यासाठी पैसे मोजणाऱ्या या फ्रँचायझीचा टेलिव्हिजन मिळकतीवरही परिणाम होणार आहे. त्यांच्या ब्रँडचेही नुकसान होणार आहे.
मुंबईने जयपूर, कानपूर व रायपूर यापैकी एका ठिकाणाची निवड करण्याचा आपला निर्णय उद्या जाहीर करू, असे कळवले आहे. मुंबईने जयपूरला सामने आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. पात्रता फेरीचा दुसऱ्या क्रमांकाचा व ‘एलिमिनेटर’ हे सामने कोलकात्ता येथे होतील. हे सामने आधी पुण्यात होणार होते. पात्रता फेरी - पहिला सामना बंगळुरू येथे होण्याची शक्यता आहे. मुंबईने दुसऱ्यांदा अंतिम सामना आयोजित करण्याची संधी गमावली आहे. याआधी श्रीनिवासन यांच्या हट्टापायी मुंबईचा अंतिम सामना हलवण्यात आला होता. या वेळी न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईला संधी गमवावी लागली आहे. अंतिम सामना आयोजित करण्यासाठी सर्वप्रथम बंगळुरूचे नाव घेण्यात येत आहे. प्रत्येक फ्रँचायझीने पाच कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्यावर कार्यवाही होईल, असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले. पुण्याच्या फ्रँचायझीचा सामना २९ एप्रिलला पुण्यात आहे, त्याला जोडूनच १ मे रोजी होणार. मुंबई-पुणे सामना पुण्यातच आयोजित करण्याची विनंती मुंबई न्यायालयाला करणार अाहे.
खास वैशिष्ट्ये
>आयपीएल महाराष्ट्रातील १३ सामन्यांची अशी विभागणी होण्याची शक्यता आहे.
>मुंबईचे सामने जयपूर येथे होण्याची शक्यता
>पुण्याचे सामने विशाखापट्टणम येथे होणार
>फ्ले ऑफ एक व अंतिम सामना बंगळुरू येथे होणार.
>फ्ले ऑफ दोन व एलिमिनेटर हे सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.
>किंग्ज इलेव्हन पंजाबने नागपुरातील ३ सामने आपल्या मोहाली या स्वगृहावर घेण्याचे ठरवले आहे.