मुंबई - कसोटी फलंदाज म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याच्या मला पुरेशा संधीच मिळाल्या नाहीत, अशी खंत वनडे क्रिकेट संघातील मधल्या फळीचा कणा असलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केली. क्रिकेकेटमधील कसोटी हा असा एकमेव प्रकार आहे, ज्या संघात त्याला कायमचे स्थान मिळवता आले नाही. विशेष बाब अशी की, रैना हा असा एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याने तिन्ही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे. मात्र, कसोटी संघात पुरेशा संधींच्या अभावी आपल्याला पक्के स्थान मिळवता आले नसल्याचे त्याचे मत आहे.
मी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. एवढेच नव्हे, तर आयपीएलमध्येही मी चांगल्या धावा ठोकल्या, असे रैनाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
एका सामन्याच्या आधारे डावलणे अयोग्य
२०१२ मध्ये कसोटीच्या तीन डावांमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नाही, हे सत्य आहे. २०१५ मध्येही तसेच घडले. याचा अर्थ कसोटी संघात खेळण्याचा माझ्याकडे अनुभव नाही, असा होत नाही.वनडे, टी-२० क्रिकेटच्या व्यग्र कार्यक्रमानंतर केवळ एका सामन्यातील कामगिरीच्या आधारे माझी परीक्षा होत असेल तर ते मला योग्य वाटत नाही, असे रैना म्हणाला.