कोलकाता - गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीनंतर विराट कोहलीच्या (३७ चेंडूंत नाबाद ५५ धावा) अर्धशतकाच्या बळावर भारताने वर्ल्डकप टी-२० सुपर-१० मध्ये पाकिस्तानला ६ विकेटने हरवले. पाकने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११८ धावा काढल्या. यानंतर भारताने १५.५ षटकांत ४ बाद ११९ धावा काढून विजय मिळवला.
धावांचा पाठलाग करताना भारताकडून कोहलीने सर्वाधिक नाबाद ५५, युवराजसिंगने २४ आणि महेंद्रसिंग धोनीने नाबाद १३ धावा काढल्या. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित १० धावा काढून आमेरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर शिखर धवन ६ धावा काढून परतला. सुरेश रैनाला तर भोपळाही फोडता आला नाही. धवन आणि रैना यांना सलग दोन चेंडंूवर मो. शमीने त्रिफळाचीत केले. यानंतर कोहली आणि युवीने चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची मॅचविनिंग भागीदारी केली. युवी बाद झाल्यानंतरही कोहलीने एक टोक सांभाळून अर्धशतक पूर्ण केले.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करून पाकिस्तानला १८ षटकांत ५ बाद ११८ धावांवर रोखले. पाकची सुरुवात चांगली झाली. शार्जिल खान आणि अहेमद शहेजाद यांनी ३८ धावांची सलामी दिली. शार्जिलला रैनाने पंड्याकरवी झेलबाद केले. पाकचा कर्णधार आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. आफ्रिदीने १४ चेंडूंत ८ धावा काढल्या. सलामीवीर शहेजाद २५ धावा काढून परतला. त्याने २८ चेंडूंत ३ चौकारांसह ही खेळी केली. मधल्या फळीत उमर अकमल (२२) आणि शोएब मलिक (२६) यांनी धावगती वाढवली. अकमलने १६ चेंडूंत १ षटकार, १ चौकार मारला, तर शोएब मलिकने पाककडून १६ चेंडूंत १ षटकार, ३ चौकारांसह सर्वाधिक २६ धावा काढल्या. सरफराज अहेमद ८, तर मोहंमद हाफिज ५ धावांवर नाबाद राहिले. हाफिज सातव्या क्रमांकावर खेळण्यास आला.
पाकिस्तान महिला संघ २ धावांनी विजयी
नवी दिल्ली - टी-२० महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला २ धावांनी पराभूत केले. सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमाने झाला. भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद ९६ धावा काढल्या. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने १६ षटकांत ६ बाद ७७ धावा काढल्या. यानंतर पावसाचा व्यत्यय आला. वेगवान पावसाने खेळ थांबवला. कटऑफ वेळेपर्यंत मैदान पूर्णपणे तयार नव्हते. यामुळे पंचांनी सामना संपल्याचे जाहीर केले. १६ षटकांपर्यंत भारताचा स्कोअर ७५ धावा होता, तर पाकिस्तानने ७७ धावा काढल्या होत्या. सामना संपताच पाकिस्तान संघाने विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली. पाक खेळाडंूनी आनंदात कोटलाच्या मैदानात फेरीही मारली.
भारतीय संघाची हाराकिरी
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून व्ही. कृष्णमूर्तीने सर्वाधिक २४ धावा काढल्या. इतरांनी निराशा केली. सलामीवीर कर्णधार मिताली राज १६ धावा काढून बाद झाली. हरमनप्रीतने १६, झुलन गोस्वामीने १४, शिखा पांडेने नाबाद १० धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक:
भारत : ७/९६. पाक ६/७७.
पुढील स्लाइड्सवर वाचा,
विराटने अर्धशतकानंतर केले सचिनला अभिवादन... वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर भारताचा सलग ११ वा विजय... दोन्ही मॅच जिंकलो तरी सेमी नक्की नाही...सामन्यात पावसाचा व्यत्यय... खेळाडूंचा सत्कार... दमदार गोलंदाजी.. धावफलक