‘फार जवळ, तरीही खूप दूर' असेच भारतीय संघाच्या दुस-या कसोटीतील पराभवानंतर म्हटले जाऊ शकते. निकालासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी भारतीय संघाची नशिबाने साथ सोडली, असेही म्हटले जाईल. मात्र, असे वारंवार होत गेले तर समजावे की कुठेतरी चुकतेय. दुस-या कसोटीत भारताचा पराभव हा पहिल्या सामन्यापेक्षा अधिक जवळ होता. अॅडिलेडमध्ये
आपण ४८ धावांनी पराभूत झालो आणि ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया ४ गड्यांनी विजयी झाला. जर ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियासमोर ५०-६० धावांचे लक्ष्य असते, तर गोलंदाजांनी आपल्याला विजय मिळवून दिला असता. मात्र, पराभवाचे अंतर मोठे होत गेले. त्यामुळे आव्हानाला सामोरे जाण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. धाडस कमजोर होत गेले आणि चांगले प्रयत्नही अपुरे ठरले.
भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया आणि यापूर्वी इंग्लंड, तसेच मागील वर्षी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवात समानता आहे. या सर्व सामन्यांत भारताला विजयाची मोठी संधी होती. मात्र, हीच संधी गमावून भारताने पराभव पत्करला आहे. याला दुर्दैव म्हणावे लागेल किंवा ऐन मोक्याच्या ठिकाणी सुमार खेळी करण्याचे संकेत आहेत. खरेच, नशिबानेही खेळाला चांगली रंगत येते. मात्र, नशिबाची भूमिका फारशी नसते.
सातत्याची खेळी, प्रचंड प्रेरणा आणि प्रभावी डावपेचांच्या बळावर मागील चार वर्षे भारतीय संघ कसोटी क्रमवारीत नंबर वन होता. मात्र, आता हाच संघ सातव्या स्थानाजवळ आहे. सर्वच विभागांतील सुमार कामगिरी, साधारण डावपेच, प्रेरणेचा अभाव आणि दुर्दैवानेही भारतीय संघाच्या कामगिरीचा दर्जा घसरला. ऐन बरोबरीत असताना भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. यात कोणा एका खेळाडूच्या वा सांघिक खेळीने आपल्याला विजय मिळाला असता. मात्र, असे काहीही झाले नाही. त्यामुळे संघ पूर्णपणे ढेपाळला.
सध्या सुरू असलेल्या मालिकेवर एक नजर टाकू. एका बाजूने भारतीय संघाने केवळ तीन सत्रांत सुमार कामगिरी केली. मात्र, पराभव दोन्ही कसोटीत झाला. जेव्हा वाटले की आता भारताचा विजय आहे, नेमकी त्याच वेळी काहीतरी गडबड झाली. अॅडिलेड कसोटीत विजयासमीप असताना भारतीय संघाची फलंदाजी शेवटच्या सत्रात रंगली होती. ब्रिस्बेनमध्ये असे दोनदा घडले. पहिल्या वेळी तिस-या दिवसाच्या दुस-या सत्रात आपण ऑस्ट्रेलियाच्या शेपट्या गुंडाळण्यात अपयशी ठरलो. त्यानंतर चौथ्या दिवशी सुरुवातीच्या तासात चार विकेट गमावल्या आणि डाव संपला.
संघ नवा आहे, असा काढलेला तर्कही चुकीचा ठरेल. यासाठी आता धीर धरण्याची गरज आहे. सध्या सर्वच संघ एका वेगळ्याच पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेतून जात आहेत. सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघाचेच पाहा ना, टीममध्ये युवा खेळाडूंचा भरणा आहे. दुस-या कसोटीत तर या संघाचा कर्णधार आणि सर्वात विश्वासू फलंदाज मायकेल क्लार्कदेखील बाहेर आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी हाच संघ पाकिस्तानविरुद्ध मालिकेत ०-२ ने पराभूत झाला होता. आता संघाने पुनरागमन केले. ह्यूजच्या मृत्यूचा धक्का वेगळा आहे. ऑस्ट्रेलिया संघ फार संवेदनशील आहे, असे सर्वच जण म्हणाले. मात्र, या संघाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि संकटात स्वत: मजबूत राहिले. त्यापेक्षा मोठी चिंता भारतीय संघातील खेळाडूंकडून आहे. भारतीय खेळाडूंची स्थिती जगात चांगली आहे. मात्र, खेळात हे फारच कमी दिसते. यात नियमिततेचा अभाव आहे.
भारतीय संघाने अनेक वेळा असाधारण कामगिरी केल्याचे दिसून येते. मात्र, काही सामन्यांतच सांघिक खेळी दिसते. यातूनच भारताच्या प्रतिष्ठेला वारंवार धक्का बसतो. याचाच परिणाम म्हणून धोनीचे नेतृत्व शेवटच्या टप्प्यात आहे. अनेक खेळाडूंचे संघातील स्थानही निश्चित नाही. अशा परिस्थितीत चुकांना दवडून चालणार नाही. चांगली कामगिरी हे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. खेळाडूंना इच्छाशक्ती आणि दृढता आपल्या खेळात दाखवावी लागेल. आता मालिकेतील दोन कसोटी शिल्लक आहेत. वातावरणात बदलही होऊ शकतो. मात्र, वेळ आणि धाडस वेगाने कमी होत आहे.