आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिजटाऊन - भारत अ आणि वेस्ट इंडीज अ संघादरम्यानचा पहिला प्रथम श्रेणीचा क्रिकेट सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. विजयासाठी मिळालेल्या 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने तिस-या दिवसअखेर 3 विकेट गमावून 22 धावा काढल्या.
वेस्ट इंडीजला दुस-या डावात 210 धावांत गुंडाळल्यानंतर दुस-या डावात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने अवघ्या 15 धावांच्या आत आपल्या आघाडीच्या तीन विकेट गमावल्या. अभिनव मुकुंद दुस-या डावातही भोपळा फोडू शकला नाही. अजिंक्य रहाणे 5 आणि पहिल्या डावात शानदार 94 धावा काढणारा रोहित शर्मा या वेळी शून्यावर बाद झाला. भारताच्या 7 विकेट अद्याप शिल्लक आहेत.
तत्पूर्वी, वेस्ट इंडीज अ संघाने तिस-या दिवशी दुस-या डावात बिनबाद 3 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. एल. सिमन्स (53) आणि क्रेग ब्रेथवेट (50) यांनी शानदार फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मोडताच भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारताने विंडीजला अवघ्या 210 धावांत गुंडाळले. रोहित शर्माने 4 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारने 3 गड्यांनी बाद केले. समी अहेमदने 2, तर राहुल शर्माने 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक - वेस्ट इंडीज अ पहिला डाव 252. भारत अ पहिला डाव 277. वेस्ट इंडीज अ दुसरा डाव 210. (सिमन्स 53, ब्रेथवेट 50, 4/41 रोहित, 3/44 भुवनेश्वर). भारत अ दुसरा डाव 3 बाद 22. (धवन नाबाद 13.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.