नवी दिल्ली- आयपीएलच्या सहाव्या सत्रातील 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरणी तपास करणार्या मुदगल समितीने आज (सोमवार)
आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. या अहवालावर 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून बडे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या अहवालावर लवकरात लवकर सुनावणी करण्यासाठी बीसीसीआय कोर्टात अपील करणार आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनसह क्रिकेटपटू एस श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.
बॉलिवुड अभिनेता विंदू दारा सिंगला सट्टेबाजीच्या आणि श्रीनिवासन यांचा जावाई मयप्पनला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या न्यायमूर्ती मुदगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज अंतिम अहवाल बंद लिफाफ्यातून कोर्टात सादर केला.
उल्लेखनीय म्हणजे श्रीनिवासन यांना दुस-यांदा अध्यक्षपदी नियुक्त करण्यासाठी बीसीसीआयची वार्षिक सभा 20 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. परंतु जोपर्यंत सुप्रीम कोर्ट श्रीनिवासन यांना निर्दोष घोषित करत नाही तोपर्यंत त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची शक्य तितक्या लवकर सुणावणी होण्यासाठी श्रीनिवासन यांचे वकील प्रयत्न करत आहेत.
मुदगल समितीमध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव, वकील निलय दत्ता, पोलिस उपमहासंचालक (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) बी. व्ही. मिश्रा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा समावेश होता.