वेलिंग्टन - भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णित अवस्थेत सुटली. यामुळे न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने बाजी मारली. यजमान संघाकडून कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने 302 धावांची विक्रमी खेळी केली. न्यूझीलंडने तब्बल 680 धावांचा डोंगर उभा केला. यजमानांकडून कसोटी पदार्पण करणार्या निशामने (137*) शतक ठोकले. त्यानंतर भारताकडून विराट कोहलीने (नाबाद 105) शतक ठोकून सामना ड्रॉ केला.
न्यूझीलंडने 2002 नंतर प्रथमच भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विदेशी भूमीवर भारताचा हा सलग चौथा मालिका पराभव ठरला आहे. यापूर्वी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव झाला. सकाळी न्यूझीलंडने आपल्या दुसर्या डावात 6 बाद 571 धावांवरून सुरुवात केली. ब्रेंडन मॅक्लुम (281 नाबाद) आणि निशाम (नाबाद 67) यांनी डावाला पुढे नेले. या दोघांनी भारतीयांची मनसोक्त धुलाई केली.
प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांत उत्साह
ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर धावा घेत मॅक्लुमने दिवसाची सुरुवात केली. या सामन्याचा हीरो आणि इतिहासात आपले नाव कोरणार्या मॅक्लुमच्या प्रत्येक फटक्यावर चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. जहीर खानच्या चेंडूवर आपला 32 वा चौकार खेचताना मॅक्लुमने त्रिशतक पूर्ण केले. त्रिशतक पूर्ण झाल्यानंतर मैदानावर बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. त्रिशतकानंतर मैदानावर उपस्थित असलेले मॅक्लुमचे वडील स्टूसुद्धा जल्लोष करत होते.
पुढील् स्लाइडमध्ये, अनुष्काच्या 'लिप' वरील प्रश्नावर विराट नाराज