नवी दिल्ली -
टीम इंडियाने तीन वर्षांपूर्वी
आपल्या जमिनीवरच वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले होते. १९८३ नंतर भारताने दुस-यांदा वर्ल्डकपचा किताब जिंकला होता. २०११ मध्ये विजय मिळवणा-या या भारतीय संघातील एक खेळाडू असासुद्धा होता, ज्याचे मॅच फिक्सरसोबत कनेक्शन होते. जस्टिस मुकुल मुद्गल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार जस्टिस मुकुल मुद्गल समितीच्या अहवालानुसार हे समजले आहे की, हा खेळाडू टीम इंडियाचा नियमित खेळाडू नाही. मात्र, त्या खेळाडूने मागच्या आयपीएलमध्ये एका प्रमुख संघाकडून सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे मॅच फिक्सिंगमध्ये मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंसह चेन्नई सुपरकिंग्जशी संबंधित गुरुनाथ मयप्पन यांची नावे समोर आली होती.
अहवालातील माहितीनुसार ज्या खेळाडूचे नाव पुढे आले आहे, त्या खेळाडूचे चेन्नई किंवा राजस्थानच्या फ्रँचायझीशी काहीही घेणे-देणे नाही. याप्रकरणी इतर दोन संघांचे खेळाडू संशयाच्या भोव-यात येतात. तीन वर्षांपूर्वीच्या फोन टॅपिंगवरून या खेळाडूची चौकशी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्ती करण्यात आलेले आयपीएस अधिकारी बीबी मिश्रा यांनी त्या खेळाडूला समन्स दिले आणि चौकशी केली. बीबी मिश्रा यांना जस्टिस मुकुल मुद्गल समितीला मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आले.
२०११ च्या वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाचे खेळाडू हे आहेत : महेंद्रसिंग धोनी, कर्णधार, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग,
गौतम गंभीर,
विराट कोहली, युसूफ पठाण, सुरेश रैना, युवराजसिंग, आर. अश्विन, पीयूष चावला, प्रवीणकुमार, मुनाफ पटेल, आशिष नेहरा, जहीर खान आणि हरभजनिसंग.
हे खेळाडू झाले संघातून आत-बाहेर
गौतम गंभीर : इंग्लंडविरुद्ध मागच्या वर्षी वनडे खेळून पुन्हा संघाबाहेर. या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळल्यानंतर पुन्हा संघाबाहेर आहे.
युवराजसिंग : द. आफ्रिकेविरुद्ध २०१३ मध्ये वनडे खेळल्यानंतर संघाबाहेर. २०१४ मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळल्यानंतर पुन्हा संघाबाहेर झाला.
जहीर खान : ऑगस्ट २०१२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला. २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी खेळून पुन्हा संघाबाहेर.
हरभजनसिंग : जानेवारी २०११ नंतर वनडेतून बाहेरच. २०१३ मध्ये कसोटीत पुनरागमन, नंतर पुन्हा संघाबाहेर. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सहभाग.