आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड : मी माझ्या पद्धतीने गोपीनाथगड हे त्यांचे स्मारक उभे केले आहे. पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात औरंगाबादेत जाहीर झालेले गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक करता आले नाही. एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत यासाठी प्रयत्न केले. परंतु, आता मुंडेंचे स्मारक करा असे म्हणायची लाज वाटते. त्यापेक्षा मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी करावे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासह इतर मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी २७ जानेवारी रोजी आपण औरंगाबाद येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी गुरुवारी गोपीनाथगडावर केली.
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी आपल्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. यापुढे शेतकरी, महिला, शेतमजूर, वंचित, उपेक्षित, बहुजनांच्या प्रश्नांवर काम करणार आहे. मी आता साधी आमदार, नगरसेवक नाही. त्यामुळे यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम आपण करणार आहाेत, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यासह येत्या काळात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात आपण सर्व जाती-धर्मांची वज्रमूठ बांधून हाती मशाल घेत दौरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साधी वीटही रोवली नाही
पंकजांच्या भाषणापूर्वी एकनाथ खडसे भाषणात म्हणाले की, मी मंत्री असताना औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडेंचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न केेले. दुग्धविकास विभागाची जागा मी मुंडेंच्या स्मारकासाठी उपलब्ध करून दिली. परंतु, पाच वर्षांत साधी वीटही या स्मारकाची रोवली गेली नाही, असे खडसे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.