आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद । जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादेत दूर केली. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर हा वाद मिटला. यात चाणाक्ष खोतकरांनी विधानसभेची मुदत संपण्यापूर्वीच सुरक्षितपणे विधान परिषदेत स्वत:ची वर्णी लावून घेण्याचा मार्ग मोकळा करून घेतला. जालना विधानसभेत निवडून येण्याची खात्री नसल्याने औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते निवडणूक लढवू इच्छितात. ऑगस्टमध्ये ही निवडणूक होईल. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि युतीला येथे स्पष्ट बहुमत आहे. या जागेवर वर्णी लावण्याची अट भाजपकडून मान्य करुन घेतल्यानंतर खाेतकरांनी दानवेविराेधाची तलवार म्यान केल्याची माहिती आहे.
२०१४ मध्ये निसटता विजय म्हणून आता नकाेय विधानसभा
जालना विधानसभा मतदारसंघातील शहरी भागात काँग्रेसचे तर ग्रामीण भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. शहरात प्रामुख्याने बहूभाषिकांची, दलित व मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. दानवे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागात भाजपचे वर्चस्व वाढले अाहे. आता युती झाली तरी भाजप विधानसभेला मदत करेल का, याबाबत खाेतकर साशंक अाहेत. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना खाेतकर यांचा अवघ्या २९६ मतांनी विजय झाला हाेता. त्यामुळे २०१९ विधानसभेत धाेका नको म्हणून खाेतकरांना आता विधान परिषद हवी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.