आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
उस्मानाबाद - उस्मानाबाद लाेकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेने माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव जाहीर केले. शिवसेनेत प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्ध उपनेते तथा अामदार प्रा. तानाजी सावंत यांचा प्रभावशाली गट आहे. सावंत यांची शिवसेनेत एंट्री झाल्यापासून ही गटबाजी टोकाला गेली. 'लक्ष्मी'पुत्र असलेल्या प्रा. सावंत यांचे 'मातोश्री'वर चांगले वजन असून, तुलनेने प्रा. रवींद्र गायकवाड यांचा संपर्क कमी झाला आहे. पक्षश्रेष्ठींकडे जसा त्यांचा संपर्क कमी झाला तसाच गेल्या ५ वर्षांत मतदारसंघातील जनतेसोबतचाही संपर्क तुटत गेला. लोकसभेच्या निवडणुकीत २ लाखांहून अधिक मताधिक्य मिळाल्यानंतर त्यांच्याकडून मतदारांना ज्या अपेक्षा होत्या, त्याची पूर्तता तुलनेने झाली नाही. किंबहुना ते संपर्कातच नाहीत, अशी मतदारांची तसेच खुद्द शिवसैनिकांची ओरड होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण व संसदेतील उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांना केलेली अरेरावी यामुळे गायकवाड यांची प्रतिमा देशपातळीवर मलिन झाली. या दाेन्ही घटनांच्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रा. गायकवाडांच्या पाठीशी उभे राहिले असले तरी त्यांना उमेदवारी नाकारण्यास ही कारणेही कारणीभूत ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गायकवाड यांनी खासदार झाल्यापासून उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचा मोठा मेळावा किंवा लोकोपयोगी कार्यक्रम घेतला नव्हता, अशी कार्यकर्त्यांची तक्रार होती. ते 'नॉट रिचेबल' खासदार आहेत, अशी टीकाही हाेत हाेती. विशेषत: या मतदारसंघात येणाऱ्या बार्शी तालुक्यातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र स्वरूपाच्या भावना होत्या. त्यामुळे यंदा गायकवाड यांना पक्ष संधी देईल की नाही अशा शंका वर्तवल्या जात हाेत्या. मात्र, सुरुवातीच्या बैठकीत पक्षप्रमुखांनी गायकवाड हेच उमेदवार असतील, असे सांगून त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गायकवाड कामाला लागलेही; मात्र प्रा. सावंत गटाने आपले राजकीय वजन वापरून त्यांच्या नावाचा विराेध 'माताेश्री'पर्यंत पाेहाेचवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ती गायकवाड यांच्याविराेधातच हाेती.
वास्तविक पाहता उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विशेषत: तानाजी सावंत सक्रिय झाल्यापासून शिवसेनेत आमूलाग्र संघटनात्मक बदल करण्यात आला अाहे. प्रा. सावंत यांनी ओमराजे यांच्या मर्जीतील व्यक्तींना पदे वाटप केली आहेत. अर्थात याच नव्या पदाधिकाऱ्यांनी अाता लाेकसभेसाठी ओमराजे यांच्या नावाची शिफारस केली, अशी चर्चा आहे. मात्र, प्रा. गायकवाड यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांशी किंवा शिवसैनिकांशी संपर्क कमी करतानाच खासदार म्हणून एखादे नजरेत भरेल, असे कामही न केल्याने त्यांची उमेदवारी प्रबळ ठरू शकली नाही.
वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्त्यांची नाराजी
खासदार रवींद्र गायकवाड हे मतदारसंघात वादग्रस्त ठरले. त्यातच आमदार तानाजी सावंत यांच्या मोठ्या गटाशी त्यांचे कधीच जमले नाही. तसेच ते कार्यकर्त्यांसाठी सहज उपलब्ध होत नसल्याने कार्यकर्ते त्यांच्यावर प्रचंड नाराज होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.