आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेच्या अधिवेशनादरम्यान बुधवारी लोकसभेत गदारोळातच चर्चा झाली. या प्रकरणी काँग्रेस, बसपा, शिवसेना, सपा व राष्ट्रवादी सरकारला घेरले. सभागृहात लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, दिल्लीत तीन दिवस दंगली सुरू होत्या. तेव्हा गृहमंत्री अमित शहा कोठे हाेते? काय करत होते? काँग्रेसच्या आरोपावर शहा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, दंगल सुरू असताना ट्रम्प यांच्या कार्यक्रमात होतो, असेही लोक बोलू लागले आहेत. हा कार्यक्रम नियोजित होता. असे असूनही २४ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६.३० वाजता दिल्लीला पोहोचलाे होताे. ट्रम्प यांच्यासोबत ताजमहाल किंवा राष्ट्रपती भवनात गेलो नाही. अधिकाऱ्यांसमवेत तीन बैठका घेतल्या. पहिली बैठक त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता, दुसरी २५ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता व तिसरी बैठक सायंकाळी ६.३० वाजता घेतली. हिंसाचार झालेल्या भागाला जाऊन भेट द्यावी व पोलिसांचे मनोबल वाढवावे, असे मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सांगितले. २४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता हिंसाचाराची बातमी आली होती. २५ फेब्रुवारीला रात्री ११ च्या सुमारास हिंसाचाराची अखेरची बातमी आली होती. पोलिसांनी ३६ तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. हिंसाचार दिल्लीच्या १३ टक्के लोकसंख्येपर्यंत मर्यादित राहिला. त्याची झळ दिल्लीतील उर्वरित लोकसंख्येला बसू दिली नाही. पोलिसांमुळेच हे शक्य झाले. या प्रकरणात आतापर्यंत ७०० हून जास्त एफआयआर नोंदवण्यात आले. २ हजार ६४७ लोकांना अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे.
विरोधकांचा हल्ला : हिंदूंनी भडकावले, मुस्लिम सुरक्षित नाहीत, राजधर्म कुठेय?
> राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी गुजरात दंगलीची आठवण काढून सरकारवर टीकास्त्र सोडले. अशी घटना राज्यात आधीही झाली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी त्या राज्याला राजधर्माचे पालन करा, असे बजावले होते, असे त्यांनी सांगितले.
> सपा खासदार शफीकुर्रहमान बर्क म्हणाले- या देशात मुस्लिमांचे जीवन सुरक्षित नाही. बसपाचे रितेश पांडे म्हणाले, हे नरसंहाराचे प्रकरण आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, शाहीनबागमध्ये २०-२५ लोकांनी सुरू केलेले आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले. गृहमंत्री व गुप्तचर यंत्रणा करत होती?
> एमआयएमचे खासदार असदुद्दीन आेवेसी म्हणाले- एका महिलेने त्यांच्यात ईश्वर दिसतो असे म्हटले. तेव्हा पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. दिल्लीतील हिंसाचारामुळे मन विव्हळत नाही, मग पंतप्रधान ईश्वर कसे?
सत्ताधाऱ्यांचा पलटवार : विरोधकांनी प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत, दोष भाजपला
> भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी म्हणाल्या-घरातून बाहेर न पडणारे लोक भेकड असल्याचे १४ फेब्रुवारीला अध्यक्ष सोनिया गांधींनी म्हटले होते. त्यानंतर उमर खालिदने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. एमआयएमचे नेते वारिस पठाणने आम्ही १५ कोटी आहोत, परंतु सर्वांवर भारी पडू, असे वक्तव्य केले होते. त्यानंतरही विरोधी पक्ष कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्यांना हिंसाचाराचे कारण ठरवत आहे. मात्र त्यांची वक्तव्ये हिंसाचाराच्या खूप आधी किंवा नंतरची आहेत.
> जदयूचे खासदार राजीव रंजन चौधरी म्हणाले, दिल्लीत हिंसाचार झाला. त्यामागे सीएएविरोधी निदर्शनांमुळे निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत ठरवली असावी. सीएएला विरोध करायचा असल्यास विरोध थेट सरकारकडे मांडला पाहिजे. एनआरसी आणण्याचा विचार नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. मग अकारण संभ्रम निर्माण का केला जात आहे?
स्पष्टीकरण : जीआयएने सोपवला अहवाल- दिल्ली हिंसाचार पूर्णपणे कट
> दिल्ली हिंसाचारावर बुद्धिजीवी व शिक्षणतज्ञांचा समूहाने (जीआयए) बुधवारी गृह मंत्रालयास आपला अहवाल सोपवला. जीआयएच्या संयाेजक मोनिका अरोडा यांनी अहवालातील माहिती दिली. त्यानुसार दिल्ली हिंसाचार हा पूर्ण कट होता. ‘लेफ्ट जिहादी मॉडेल ऑफ रिव्होल्युशन’ने त्याची योजना आखली होती. ते इतर क्षेत्रातही हिंसाचार करू पाहत होते.
> अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली हिंसाचारावर नगरसेवक ताहिर हुसेन व पीएफआयवर अवैध सावकारी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस म्हणाले, हिंसाचार प्रकरणात ताहिरच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. आबिद, मोहंमद शादाब, राशिद सैफी अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे हिंसाचारादरम्यान २४ फेब्रुवारीला ताहिरसोबत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.