आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - सिंचन प्रकरणात आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप व्यक्तिगत हेतूने, व्यावसायिक शत्रुत्वातून करण्यात येत असून मंत्रिपदावर असताना आपण कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. चुकीचे काम केले नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण जबाबदारी पार पाडली, असे नमूद करताना तपासाचे मॉनिटरिंग न्यायालयामार्फत होऊ नये, अपवादात्मक प्रकरण नसल्याने तपास सीबीआय अथवा अन्य कुठल्या यंत्रणेला सोपवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून केली आहे.
व्यक्तिगत हेतू साध्य करण्यासाठी न्यायालयाचा माध्यम म्हणून वापर करता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर निव्वळ आरोप झाले म्हणून आरोपी करण्याचे निर्देशही न्यायालय देऊ शकत नाही. तपास यंत्रणा कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असतात. त्यामुळे त्यांना याचिकाकर्त्याच्या इच्छेप्रमाणे चौकशी पार पाडण्यात बाध्य केले जाऊ शकत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पार पडलेला तपास, दाखल झालेले गुन्हे मागील सरकारच्या कार्यकाळात दाखल झाले आहेत. त्या वेळी मी विरोधी पक्षातील प्रमुख नेता होतो, याकडेही पवार यांनी शपथपत्रातून लक्ष वेधले आहे.
याचिकाकर्त्यांकडून माझ्यावर लावण्यात येत असलेले सर्व आरोप मी नाकारतो. मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना मी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. संबंधित खात्याचा मंत्री आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने दुजाभाव न बाळगता सर्व नियमांचे पालन केले आहे. प्रत्येक निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.