आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हेही उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचे आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा आम्ही नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. त्याची सुरुवात आम्ही उद्या करणार असून उद्या कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर होईल. अर्थातच ही पहिली यादी आहे, अंतिम यादी नाही. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करू."
पुढे ते म्हणाले की, "कर्जमूक्ती संदर्भात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. 20 हजार शेतकऱ्यांचे अकाऊंट असतील. हीच यादी उद्या जाहीर करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार. तीन महिन्यांत टप्प्याटप्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे."
'विरोधकांनी चांगल्या कामांचे कौतुक करावे'
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवरही निशाना साधला. ते म्हणाले की, "उठबस सरकारवर आरोप करणे म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणे नव्हे, सरकारच्या चांगल्याला कामाचे कौतुक करायला शिकावे. विरोधकांच्या सर्वच प्रश्नांना मी उत्तर देत नाही. विरोधाला विरोध करू नये, या सरकारचे हे पहिलेच मोठे अधिवेशन आहे. हे सरकार आता स्थिरावल आहे, हेच विरोधकांना पचनी पडत नाही आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.