आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : राज्य सरकार त्यांना हवे तसे निर्णय न्यायालयाच्या माध्यमातून घेत असून न्यायालय आणि राज्य सरकारमध्ये संगनमत झाल्याने न्याय तरी कुणाकडे मागायचा, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी भांडूप येथील सभेत उपस्थित केला. तसेच त्रिभाषा सूत्री असताना राज्यात जर चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर बांबू बसेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
राज ठाकरे म्हणाले, आरेमधील झाडे कापताना तुम्हाला कुणी विचारले का? कारशेडसाठी कुलाब्यातील बीपीटीची जागा हा पर्यायही दिला होता. पण ती जमीन कुठल्या तरी उद्योगपतीला देण्यासाठी आरेमधील झाडे कापून टाकली. रात्रीच्या वेळी झाडाची पानेही तोडू नयेत, असे आपल्यावर संस्कार आहेत. मग रात्रीतून ही सगळी झाडे कापून टाकली. शुक्रवारी रात्री निर्णय घेतला. शनिवार-रविवार न्यायालय बंद. सोमवारी न्यायालय सुरू होणार. म्हणून तोपर्यंत सगळी झाडे छाटून टाकली, असा आरोप राज ठाकरे यांनी सरकार आणि न्यायालयावर केला.
टोलचा विषय असो की परळच्या एल्फिन्स्टन पुलावरील झालेली दुर्घटना असो, सीएसटीला रझा अकादमीने काढलेला मोर्चा असो. ज्या-ज्या वेळी अन्याय झाला त्या-त्या वेळी मनसेने आवाज उठवला. मुंबईतील रेल्वेस्थानके फेरीवालामुक्त करून दाखवली. मनसेने जे प्रश्न हाती घेतले ते तडीस नेले, असेही ते म्हणाले.
शेतकरी आत्महत्येबद्दल अमित शहा बोलत नाहीत...
भाजप आणि शिवसेना यांनी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळले नाही. मात्र, याचा तुम्हाला विसर पडला आहे. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात येऊन शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी काश्मीरवर बोलून दिशाभूल करत आहेत, अशी टीकाही राज यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.