आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठ आंदोलनातील शहिदांना अभिवादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी याकरिता १९६८ साली आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांच्या बलिदानानंतर विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली. 


विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन २० ऑगस्ट रोजी करण्यात येते. सोमवारी झालेल्या या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख अतिथींनी शहिदांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद््भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. 


याप्रसंगी विद्यापीठातील संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, डॉ. ययाती तायडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, सहायक कुलसचिव डॉ. श्रीकांत आहेरकर, विद्यापीठ अभियंता रामदास खोडकुम्भे, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मजूर, विद्यार्थी तथा विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रा. संजय कोकाटे यांनी केले. पोलिस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी बिगुल वाजवून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी गुलाब पुष्प अर्पण करीत शहिदांना वंदन केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांच्यासह प्रा. संजय कोकाटे, देशमुख, शशी भोयर आदींनी परिश्रम घेतले. 

बातम्या आणखी आहेत...