आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसर - सारागढीच्या युद्धात १० हजार पठाणांचा बीमोड करणाऱ्या २१ धाडसी शूरवीरांच्या कामगिरीवर बनवण्यात आलेला अक्षयकुमारचा चित्रपट “केसरी’ २१ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल जगभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीत आणखी एका दिग्गज व्यक्तीचे मोठे योगदान आहे. त्यांनीच या चित्रपटाची मूळ कथा लिहिली. त्याचबरोबर शहीद झालेल्यांची छायाचित्रे तयार करवून घेतली. हीच छायाचित्रे या चित्रपटाचा मुख्य गाभा ठरली. या दिग्गज व्यक्तीचे नाव आहे गुरिंदरपालसिंग जोशन. ते मूळचे अमृतसरचे असून सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असते. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्याची २८ वर्षे खर्ची घातली. जोशन अमृतसर शहरातील न्यू बाग रामानंद येथील रहिवासी आहेत. सध्या ते कुटुंबीयांसह अमेरिकेत राहतात. त्यांना शहीद झालेल्या या शूरवीरांबद्दल लहानपणापासूनच खूप ओढा होता. १९८७ पासून त्यांच्या चरित्रावर काम करण्यास सुरुवात केली. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर त्यांनी लेख लिहिले. शहिदांच्या कुटुंबीयांची माहिती जमवून त्यांची माहिती गोळा करत गेले. गुरिंदरपाल सांगतात, या २१ महान शहिदांचे अजरामर कार्य लोकांसमोर आले पाहिजे, हेच एक स्वप्न होते. आवश्यक ती माहिती गोळा केल्यानंतर २०११ मध्ये त्यांची कथा पूर्ण झाली. हीच कथा २०१४ मध्ये सारागढी साका- ‘अद्वितीय जंगी मिसाल’ पुस्तकरुपात आले.
२१ शीख जवानांनी मारले ६०० अफगाणी सैनिक
सारागढी नॉर्थ इस्ट फ्रंटियर येथे किल्ला होता. अफगाणिस्तानी पठाण या किल्ल्यावर सातत्याने आक्रमण करत होते. यामुळे ब्रिटिशांनी तेथे एक छावणी उभारली आणि ३६ शीख रेजिमेंटची उभारणी केली. १८९७ मध्ये दहा हजार अफगाणी सैनिकांनी येथे आक्रमण केले. त्या वेळी तेथे फक्त २१ शीख सैनिक होते. परंतु हवालदार ईश्वरसिंह यांच्या नेतृत्वाखालील टीम मागे हटली नाही. शत्रूशी लढा दिला. १२ सप्टेंबर १८९७ रोजी या सैनिकांनी शत्रूशी लढा दिला. त्यांना पळता भुई थोडी केली. स्वत: वीरमरण तर पत्करलेच, पण ६०० अफगाणिस्तानी सैनिकांना कापून टाकले.
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, कॅनडा व अमेरिकेतून छायाचित्रे जमवली, सहा महिने चित्रकारांकडून काढले पोर्ट्रेट
गुरिंदरपालसिंह जोसन यांनी सांगितले, या शहिदांचे वंशज देशभरातील विविध राज्यांसह परदेशातही राहतात. त्यांची माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी भारत, पाकिस्तान, इंग्लंड, कॅनडा व अमेरिकेचा दौरा केला. एका कुटुंबांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्यांची भेट घेतली. एकेक संदर्भ जोडत त्यांनी सर्व शहिदांची भेट घेतली. त्यासाठी त्यांना एकेका देशात अनेकदा वाऱ्या कराव्या लागल्या. काही नाव-पत्ते मिळाले तरी ते तेथून स्थलांतरित झालेले होते. परंतु त्यांनी धीर सोडला नाही. यात २८ वर्षे गेली. त्या काळात छायाचित्रे काढली जात नव्हती. त्यामुळे शहिदांची छायाचित्रे मिळणे ही खूप अवघड बाब होती. यासाठी त्यांनी एका चित्रकाराची भेट घेतली. प्रत्येक शहीद परिवारातील तीन पिढ्यांची छायाचित्रे गोळा केली. त्यावरून शहिदांचे पोर्ट्रेट तयार करत, ते योग्य वाटले नाहीत. असे त्यांचे २५-२५ वेळा प्रयत्न होत गेले. त्या शहिदांच्या स्मरणार्थ बर्तानवी सरकारने सारागढीमध्ये त्यांचे स्मारक उभारले होते. या शहिदांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर देण्याचा निर्णय बर्तानवी सरकारने घेतला होता.
२०१४ मध्ये दिग्दर्शक अनुरागसिंह भेटले
जोशन यांनी सांगितले, २०१४ मध्ये केसरी चित्रपटाचे दिग्दर्शक अनुरागसिंह यांची भेट झाली. तेव्हा अनुरागसिंह यांना या विषयावर चित्रपट बनवण्याची परवानगी दिली. या चित्रपटात या २१ शहिदांची माहिती मिळेल.
सारागढीची सगळी जबाबदारी घेतली
सारागढी आज पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहे. जाेशन यांनी पाकिस्तानी लष्कराशी संपर्क साधून तो किल्ला दुरुस्त करवून घेतला. त्यावर शहिदांची नावे कोरली. जवळच शहिदांच्या नावे पार्क व गुरुद्वारा स्थापन केला.
भूमिकेसाठी अक्षयसोबत १२ पंजाबचे, तीन अमेरिकी कलाकार
२१ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या ‘केसरी’ चित्रपटात पंजाबचे १३ कलावंत आहेत. यात अक्षयकुमारबरोबर प्रीतपाल पाली व अधृत शर्मा अमृतसरचे आहेत, तर जैतो येथील गुरप्रीत कोटी, हरभगवानसिंह, रंगदेव, चमकौरसाहिब येथील हरबिंद्र औजला, फतेहगडचे हरमन कँडी, पतियाळाचे राजदीप धालीवाल, जालंधरचे सुरमीत बात्रा, मुक्तसरसाहिबचे हरमन ढिल्लो आदी होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.