आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड- गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु सरकार स्थापन होताच दिलेले आश्वासन विसरून सरसकट कर्जमाफी न करता तत्वतः व अंशतः कर्जमाफी मान्य करीत नियमांच्या जंजाळात अडकवून फसवणूक केली, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला.
सोमवारी शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला खासदार शेट्टी मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राजगोरे, स्वागताध्यक्ष तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, मराठवाडा अध्यक्ष सुबोध मोहिते, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हनमंत राजगोरे, देवेन्द्र भुयार व किशोर ढगे आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती.
राजू शेट्टी यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका करीत शेतकऱ्यांना निवडणुका जिंकण्याआधी कर्जमाफी व दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच शेतकऱ्यांची सदैव चेष्टा केली असल्याचे म्हणाले. कर्जमाफी असो, पिकविमा रक्कम, अथवा नुकसान भरपाई असो शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम सुखाने मिळू नये याचीच भाजप सरकार दक्षता घेत आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी न देता तत्वतः व अंशतःच्या शब्द जंजाळात अडकवून ऑनलाईनच्या नावाखाली सेतु सुविधा केन्द्रांचे गल्ले भरण्याचे काम केले असल्याचे खा. शेट्टी म्हणाले.
ऊसाचे पैसे एफआरपीप्रमाणे व एक रक्कमी खात्यावर मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या संंघटीत शक्ती व चळवळीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे पैसे ऊस नेल्यानंतर चौदा दिवसांचे आत न मिळाल्यास कारखाना जप्ती करुन लिलावाद्वारे आलेल्या रक्कमेतून पैसे अदा करण्याची कायद्यात तरतूद असल्याचा उल्लेख करीत खा. शेट्टी यांनी आवश्यकता पडल्यास रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढा लढणार असल्याचे विश्वास त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.