कोलकता- मी इंचार्ज आहे तोपर्यंत पश्चिम बंगालमधील एकाही अधिकाऱ्याची बदली करून दाखवाच, असे सडेतोड आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्क निवडणूक आयोगाला दिल्याने खळबळ उडाली आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याने निवडणूक आयोगाला अशा प्रकारे आव्हान देण्याची ही पहिलीच घटना असावी.
निवडणूक आयोगाने आज पश्चिम बंगालमधील पाच पोलिस आयुक्त, एक जिल्हाधिकारी आणि दोन अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्यासह काही अधिकाऱ्यांची बदली करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. त्यावरून ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत.
आदेश मिळाल्यावर बॅनर्जी म्हणाल्या, की राज्य सरकारशी संपर्क न साधता निवडणूक आयोग एखाद्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा काय करु शकते? त्यांच्या जागी नवीन अधिकारी कसे काय नेमू शकते? तुम्ही केवळ कॉंग्रेसचे ऐकणार... कॉंग्रेस आणि भाजपसाठी तुम्ही काम करताय. तुम्हाला माझा राजीनामा घ्यावा लागेल. मी कुणाचीही बदली करणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये 17 एप्रिलपासून पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.