आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादानंतर भावंंडांना बेदम मारहाण करून एकाचा खून करणाऱ्या चौघांपैकी दोघांना गुन्हे शाखेने ४८ तासांत अटक केली. इतर दोन आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. मनोज जाधव (रा. गल्ली क्र. ५ हनुमाननगर) आणि शेख जावेद ऊर्फ टिपू मकसूद शेख (२५, रा. विजयनगर) अशी अटकेतील दोघांची नावे असून दोघेही पाचोड येथील शेतात लपले होेते.
मृत सुनील बाबूराव मुंडलिक (३५, रा. गल्ली क्र. २, पुंडलिकनगर) व त्यांचा लहान भाऊ संदीप हे दोघे रविवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून गजानन महाराज मंदिराकडून पुंडलिकनगरकडे जात होते. स्वामी समर्थ मंदिराच्या कमानीसमोर दोन दुचाकींवरून चाैघे उलट दिशेने येत हाेते. धक्का लागल्यामुळे सुरू झालेल्या वादानंतर आरोपींनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. संदीपने स्थानिकांच्या मदतीने वाद सोडवत सुनीलसह घर गाठले.
मात्र, सोमवारी सकाळी दहा वाजले तरी सुनील जागे झाले नाहीत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, अमोल देशमुख, उपनिरीक्षक शिवाजी झिने, विकास माताडे, राजेंद्र साळुंके, शिवाजी शिंदे, विशाल सोनवणे, धर्मराज गायकवाड, प्रमोद चव्हाण, ओमप्रकाश बनकर, संदीप बीडकर, ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या पथकाने आरोपींना झाल्टा फाटा येथे ताब्यात घेतले. नरेश उर्फ झेल्या गणेश पवार (३०, रा. भानुदासनगर) देवळाई परिसरात राहणारा अश्फाक व इतर आणखी दोघे त्यांच्यासोबत असल्याचे समोर आले आहे. यातील मनोज व टिपूला न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून निरीक्षक एल. ए. शिंगारे तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.