आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५० दंगलखोरांना सुमारे ३.५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी नोटीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • १५० पेक्षा जास्त जणांना बजावली होती नोटीस

आदित्य तिवारी 

लखनऊ - उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोधातील हिंसक आंदोलनात १९ जण मारले गेल्यानंतर राजधानी लखनऊसह आठ जिल्ह्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लखनऊच्या रस्त्यांवर गेल्या गुरुवारी रात्री सीएएविरोधातील आंदोलनात तोडफोड करणाऱ्यांची छायाचित्रे फलकावर लावली होती आणि त्यांच्याकडून ८८ लाख रुपये वसूल केले जातील असे म्हटले होते. सकाळी हे फलक पाहिल्यानंतर चर्चा सुरू झाली. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत संभलमध्ये २६, रामपूरमध्ये २८, गोरखपूरमध्ये ३३, बिजनौरमध्ये ४३, मेरठमध्ये १४४ आणि लखनऊत ५७ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यूपीत आतापर्यंत ३५० दंगलखोरांचा (सरकार या आंदोलकांना दंगलखोर म्हणतंय) सुमारे ३.५ कोटी रुपयांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. पाेलिस महासंचालक हितेशचंद्र अवस्थी यांचे म्हणणे अाहे की, सीएए हिंसाचारप्रकरणी जी कारवाई केली जात आहे ती कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत आहे.



रामपूरचे जिल्हाधिकारी आंजनेयकुमार सिंह यांनी सांगितले की, निदर्शनांच्या वेळी हिंसाचार करणाऱ्या २८ जणांना नोटीस पाठवली आहे. उत्तरासाठी सात दिवसांची वेळ देण्यात आली आहे. उत्तर न आल्यास सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल त्यांच्याकडून भरपाई वसूल करण्यात येईल. येथे एकूण २५ लाख रुपये वसूल केेले जाणार आहेत, तर गोरखपूरमध्ये सीएएवरून झालेल्या हिंसक आंदोलनात सहभागी ३३ जणांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी हिंसाचारात सहभागी लोकांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास पारितोषिक देण्यात येणार आहे. कानपूरमध्येही सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीच्या भरपाईसाठी नोटीस पाठवण्याचे काम सुरू आहे. १६ जणांकडून १० लाख रुपयांची वसुली केली जाणार आहे. बिजनौरमध्ये ४३ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 



तसेच लोकांना भडकावण्याच्या प्रकरणात बिजनौरचे माजी नगराध्यक्ष जावेद आफताब, मौलवी, फुरकान आणि छुइया यांच्यावर प्रत्येकी २५ हजारांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तिघेही फरार आहेत, तर दुसरीकडे बुलंद शहरात ६ लाखांच्या वसुलीसाठी नोटीस काढण्यात आली असून संभलमध्ये १५ लाखांच्या वसुलीसाठी २६ जणांना नोटीस बजावली आहे.



१५० पेक्षा जास्त जणांना बजावली होती नोटीस

१९ डिसेंबरला शुक्रवारच्या नमाजनंतर लखनऊतील चार ठाणे भागात हिंसाचार झाला होता. यात ठाकूरगंज, हजरतगंज, केसरबाग आणि हसनगंजचा समावेश आहे. तोडफोड करणाऱ्यांनी परिसरातील खासगी वाहनांना आग लागली होती. राज्य सरकार यात भरपाई वसूल करणार आहे. त्यासाठी पोलिसांनी छायाचित्र, व्हिडिओच्या आधारे १५० पेक्षा जास्त लोकांना नोटीस पाठवली होती. 

बातम्या आणखी आहेत...