आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नवी दिल्ली - भाजपच्या नेतृत्वाविरोधात दीर्घकाळापासून बंडाचे निशाण फडकवलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. शत्रुघ्न यांच्या जागी पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे उमेदवार असतील. रविशंकर प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. एप्रिल २००० मध्ये राज्यसभेवर नियुक्त झाल्यापासून रविशंकर याच सभागृहात आहेत. पाटणा साहिब येथून सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शत्रुघ्न म्हणाले की, ते पक्षाच्या निर्णयावर खुश आहेत. मी ठरवले होते की जोपर्यंत कोणी काही म्हणणार नाही, तोपर्यंत पक्ष सोडणार नाही. आता पुढे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. पाटणा साहिब येथूनच निवडणूक लढवणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. बिहारमधील भाजपचे आणखी एक महत्त्वाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांचेही नाव अद्याप तिकिटांच्या यादीत नाही. २०१४ च्या निवडणुकीत शाहनवाज भागलपूर येथून आठ हजार मतांनी पराभूत झाले होते. एनडीएच्या जागावाटपात भागलपूरची ही जागा आता जेडीयूच्या वाट्याला आली आहे.
भाेपाळमध्ये दिग्विजय सिंह, साध्वी प्रज्ञा यांच्यात लढतीची शक्यता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळमधून लढतील. काँग्रेसने रात्री उशिरा जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत दिग्विजय यांचा समावेश आहे. १९८९ नंतर काँग्रेसला अद्याप भोपाळमध्ये विजय मिळालेला नाही. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी दिग्विजय यांच्याविरुद्ध लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, यूपीएच्या काळात दिग्विजय सिंह यांनी भगवा दहशतवाद हा मुद्दा उचलून धरला होता.
कन्हैयाकुमारचा सामना गिरिराज सिंह यांच्याशी
बिहारच्या बेगुसराय येथे गिरिराज सिंह हे भाजपचे उमेदवार असून त्यांचा सामना कन्हैयाकुमार यांच्याशी होईल. भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा ओडिशातील पुरी येथून रिंगणात आहेत. पंतप्रधान मोदी येथून निवडणूक लढवणार, अशी चर्चा होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.