आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - अयोध्येतील 35 एकर जागा हिंदूंना, 15 एकर मुस्लिमांना आणि उर्वरीत जागा बौद्धांना द्या अशी मागणी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. वादग्रस्त जमीनीवर तिघांनीही दावा केला आहे, त्यामुळेच असा नवा फार्म्युला सूचवत असल्याचे राज्यमंत्री आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवर मंदिर आणि मशिदीच्या पूर्वी बौद्ध मंदिर होते. उत्खननात बौद्ध अवशेष सापडले आहेत. शंकराचार्यांच्या काळात हिंदु मतांचा प्रचार-प्रसार झाल्यानंतर हिंदुंनी बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर बांधले आणि मुस्लिम आक्रमकांनी मंदिर पाडून मशीद बांधली. त्यामुळे हा प्रश्न सामोपचारानेच सोडवावा, असे आठवले म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत जाण्याने वा संतांच्या दबावामुळे अयोध्येत राम मंदिर होणार नाही. तर ते न्यायालयाच्या निकालामुळेच होईल. त्यामुळे राम मंदिरासाठी अध्यादेश न काढता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करण्यात यावी, असे आपले स्पष्ट मत असल्याचे आठवले म्हणाले. अयोध्येत राम मंदिराच्या जागी मशिद होती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राम मंदिर बांधताना मुस्लिमांना टाळता येणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्यात यावा, असे आठवले म्हणाले.
औरंगाबादेत सभा घेणार आठवले...
20 जानेवारी 2019 रोजी नागपूर येथे आरपीआयचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात वेगळ्या विदर्भाचा ठराव करण्यात येईल. तसेच 10 फेब्रुवारी 2019 रोजी औरंगाबाद येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. एमआयएम आणि वंचित आघाडीने घेतलेल्या मैदानावरच आम्ही मेळावा घेणार आहोत. केवळ मराठवाड्यातील जनतेच्या उपस्थितीने मैदान भरवून दाखवू असे आठवले यांनी स्पष्ट केले. देशभरात 20 कोटी एकर पडीक जमीन आहे. ती सर्व भूमिहीनांना वाटप करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. उत्तर प्रदेशात एका शहराला गोडसेंचे नाव देण्याची मागणी होत आहे. इतर कुणाचेही नाव दिले तरी चालेल. पण गोडसेचे नाव देण्यापूर्वी विचार करावा, असे आठवले म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.