आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलत असताना शिवसेनेला फसवले ही चूक झाली हे माझे वक्तव्य राष्ट्रवादीने शिवसेनेला फसवू नये, अशा अर्थाचे होते. परंतु त्याचा विपर्यास करण्यात आला. भारतीय जनता पक्ष राजकारणात विशिष्ट मूल्ये घेऊन काम करतो, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष असून शिवसेना आणि आमची अनेक वर्षांची युती होती आणि मित्रपक्षाला फसवण्याची आमची वृत्ती नाही, असे स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिले.
ज्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाले त्या शिवसेनेने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी केल्या गेल्याच नाहीत. एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवलेच आहे, असे मी म्हणालो. त्या वेळी समोरच्या बाकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपने चूक केली म्हणून शिवसेना आमच्याकडे आली, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मी उपहासात्मक उत्तर दिले. अकाली दलासारख्या पक्षाबरोबर आमची ४०-५० वर्षांपासूनची युती आहे. शिवसेनेबरोबरही ३० वर्षे आमची मैत्री होती. मित्रपक्षाला फसवण्याचे काम आमच्या हातून कधीच झालेले नाही आणि भविष्यातही होणार नाही. माझ्या वक्तव्याचा कृपा करून चुकीचा अर्थ काढला जाऊ नये.
चुकीचा अर्थ काढू नये
विधानसभा निवडणुकीतील संभाव्य युतीविषयी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये भाजपच्या वतीने शिवसेनेला तसा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता. त्यामुळे फसवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विधिमंडळातील भाषणादरम्यान एकमेकांवर कुरघोडी करताना कधी-कधी अतिशयोक्ती केली जाते किंवा टोल्याला प्रतिटोला हाणला जातो.
विधिमंडळात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अशा शाब्दिक चकमकीचे अनेक किस्से आठवत असतील. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणूक प्रचारातही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे अनेक वेळा सांगितले होते. त्यामुळे माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.