आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद - शहरातील तेरणा महाविद्यालय ते पोलिस मुख्यालय या दरम्यानच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यावरून वाहनधारकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अक्षरक्ष: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर मंदिरासमोर असलेला जीवघेणा खड्डा दोघा तरुणांनी पुढाकार घेऊन बुजविण्याचा प्रयत्न केला.
तेरणा महाविद्यालय ते बसस्थानक हा शहरातील प्रमुख मार्ग असून यावरून दररोज डझनभर अधिकारी, लोकप्रतिनिधी ये-जा करतात. परंतु, अलिशान वाहनातून या खड्ड्याची तीव्रता त्यांना कधीच जाणवली नाही. मात्र, दुचाकीवरून जाणाऱ्यांना या मार्गावरून जाताना अक्षरक्षा जीव मुठीत धरावा लागतो. ज्ञानेश्वर मंदिरासमोर तर दररोज किमान एक दुचाकीस्वार विशेषता महिला या खड्यामुळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सुदैवाने अद्याप गंभीर दुखापत झालेली नसली तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला एखादा बळी गेल्यानंतर जाग येणार का असा प्रश्न पडत आहे. दरम्यान, डोळ्यादेखत होणारी दुचाकीस्वारांची गैरसोय आणि अपघात पाहून जवळच असलेल्या दुकानदार दया गवाड व परिसरातील तरुण किशोर काकडे यांनी पुढाकार घेऊन हा खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत असले तरी ही तात्पुरती मलमपट्टी असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदरील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
मनसेचा आंदोलनाचा इशारा
दरम्यान, या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात, सदरील खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नमूद करून तत्काळ सदरील खड्डे न बुजविल्यास होणाऱ्या अपघातातील जीवित व वित्तीय हानीस सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील. तसेच संबधित अधिकाऱ्याला याच खड्ड्यात बसवून आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच दादा कांबळे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.