आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोहत असतानाच कालव्यात वाहून गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

हिंगोली - वसमत शहरालगत गोविंदपुर शिवारामध्ये मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह शनिवारी सकाळी आठ वाजता गोविंदपूर शिवारातील कालव्याच्या पाण्यामध्ये आढळून आला आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरातील जयनगर मधील दीपक पांडूजी नरोटे (16) हा इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. मागील दोन दिवसापासून दीपक अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दीपक हा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वसमत शहरालगत गोविंदपुर शिवारातील कालव्यामध्ये एका युवकाचा  मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार बालाजी मिरासे, ताम्रध्वज कासले, विकास ढवळे, संदीप सुरोशे, निलेश अवचार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कालव्याच्या पाण्यातील हा मृतदेह बाहेर काढला. सदर मृतदेह वसमत येथील जयनगर मधील दीपक नरोटे याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दीपक हा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात पोहत असतानाच तो कालव्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...