आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद. मी इतिहासकार किंवा इतिहासतज्ज्ञ नाही. इतिहासावर आधारित ललित आणि सर्जनशील स्वरूपाचे लेखन करणारा कादंबरीकार हीच भूमिका मला प्रिय आहे, अशा शब्दांत प्रख्यात कादंबरीकार विनीत वाजपेयी यांनी आपल्या लेखनाचे मर्म उलगडले. अर्थात सर्जनशील लेखन करत असतानाही माझ्या लाखो वाचकांच्या जबाबदारीचे भान मी बाळगतो, याचाही उल्लेख वाजपेयी यांनी केला. दैनिक भास्करचे नॅशनल ब्रँड हेड विकास सिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
वाजपेयी म्हणाले, 'हडप्पा संस्कृतीविषयी लेखनाला मी प्रवृत्त झालो, त्याची तीन कारणे आहेत. शालेय जीवनात जी माहिती याविषयी मिळते, ती अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवते, हे पहिले कारण. पाश्चिमात्य अभ्यासकांनी इतिहासाकडे ज्या सर्जनशील दृष्टीने पाहिले, त्याचा आपल्याकडे असलेला अभाव, हे दुसरे कारण आणि पहिल्या दोन कारणांतून मला मिळालेली प्रेरणा, हे तिसरे कारण. मी हडप्पा संस्कृती, तिचा उदय, भरभराट, अस्त..याकडे सर्जनशील लेखकाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला आणि एकाच विषयावरील तीन कादंबऱ्यांची निर्मिती घडली.'
ते म्हणाले की, काशीविषयीच्या लेखनालाही या शहराची प्राचीनता, संस्कृती, स्थापत्य आणि आध्यात्मिकता हेच कारणीभूत ठरले. लेखनाच्या दृष्टीने खरे तर माझे विषय ऐतिहासिक नसून, प्रागैतिहासिक म्हणावे लागतील. पण अनेक देशी-विदेशी संशोधक-अभ्यासकांनी त्यावर प्रचंड काम केले आहे. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी ललित अंगाने हे कालखंड मांडण्याचा प्रयत्न केला.
हिंदू धर्म 'टार्गेट' केला जातोय
अलीकडे काही विशिष्ट हेतू ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केले जाते. धर्माचा अर्थ समाजाची धारणा करणे, असा असताना, मनुष्यप्राण्याने काही स्वार्थी हेतूंपायी लोकांच्या मनात परस्परांविषयी साशंकता निर्माण केली. भेद पाडले. त्यातून धर्म, जाती, वंश, भाषा. लिंग यांच्या भिंती उभ्या राहिल्या, असेही वाजपेयी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.