आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तीर्थपुरी : मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. आम्ही पहिलवान घडवण्याचे काम करतो. कुस्ती हे पहिलवानांशीच होत असते, अशांशी (हातवारे करीत) होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. राज्यात समोर लढण्यासाठी पहिलवान दिसत नाहीत, तर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना प्रचाराला कशासाठी बोलावता आहात, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. ते घनसावंगी येथील जाहीर सभेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे घनसावंगी येथील विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी जाहिर सभा घेतली. याप्रसंगी माजी आमदार अरविंद चव्हाण, निसार देशमुख, राजाभाऊ देशमुख, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, उत्तमराव पवार, नंदकुमार देशमुख, तात्यासाहेब चिमणे, शैलेंद्र पवार, सुदामराव मुकणे, बाळासाहेब जाधव, कल्याण सपाटे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना उद्ध्वस्त करणे हे एकमेव काम सेना-भाजपच्या लोकांनी सुरू केले आहे. मलाही ईडीमार्फत नोटीस पाठवली. कारण नसताना माझ्यावर जर खोट्या केसेस केल्या तर सामान्य लोकांची काय स्थिती असेल. आपल्याला हे राज्य बदलायचे असून चुकीच्या लोकांच्या हातातून सता काढून घ्यायची अाहे. परिवर्तन करण्यासाठी मतांचा जोगवा मागायला मी आपल्याकडे आलो अाहे, असे शरद पवार या वेळी म्हणाले.
पवारांचे हातवारे
आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत, पण समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. कुस्ती पहिलवानांची होते. अशांची (हातवारे करून) होत नाही, असा टोला पवार यांनी लगावला. यावेळी पवारांनी जे हातवारे केले त्यावर एकच हशा पिकला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.